वृत्तसंस्था /काकामिगहारा (जपान)
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने गुऊवारी येथे शेवटच्या साखळी सामन्यात चिनी तैपेईचा 11-0 असा दणदणीत पराभव करून आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या विजयामुळे ‘अ’ गटातील भारताचे आघाडीचे स्थानही मजबूत झाले आहे. भारताने साखळी टप्प्यात अपराजित राहताना 3 सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला. भारताकडून वैष्णवी विठ्ठल फाळके (पहिल्या मिनिटाला), दीपिका (तिसऱ्या मिनिटाला), अन्नू (10 व्या व 52 व्या मिनिटाल), ऋतुजा दादासो पिसाळ (12 व्या मिनिटाला), नीलम (19 व्या मिनिटाला), मंजू चोरसिया (33 व्या मिनिटाला), सुनीलिता टोप्पो (43 व्या व 57 व्या मिनिटाला), दीपिका सोरेंग (46 व्या मिनिटाला) आणि मुमताज खान (55 व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
चिनी तैपेईवर सातत्याने हल्ले करत भारताने सुरुवातीपासून आपले वर्चस्व दाखवले. वैष्णवीने गोल करून भारतासाठी सुऊवात केली, त्यानंतर दीपिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करून संघाची आघाडी दुप्पट केली. तसेच अन्नू आणि ऋतुजा यांनी पहिल्या सत्राच्या समाप्तीपूर्वी प्रत्येकी एक गोल करून भारताला 4-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रातही असेच चित्र दिसून आले. भारताने चेंडूवर ताबा मिळवून आणि सतत आक्रमणे करून खेळावर नियंत्रण राखले. यात नीलमने केलेल्या गोलमुळे मध्यंतराच्या वेळी भारताला 5-0 अशी आघाडी घेता आली. त्यानंतर मंजू आणि टोप्पो यांनी गोल केल्याने भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले आणि तिसरे सत्र संपले तेव्हा भारत 7-0 ने आघाडीवर राहिला. दीपिका सोरेंग, अन्नू, मुमताज खान आणि टोप्पो यांनी प्रत्येकी एक गोल केल्याने भारतीय संघाचा वेग अंतिम सत्रातही कमी झाला नाही. शनिवारी उपांत्य फेरीत भारताचा जपान किंवा कझाकिस्तानशी सामना होईल.