2025 पर्यंत 22 अब्ज डॉलर्स व्यवसायाचे लक्ष्य गाठणार : राजनाथ सिंह यांचा विश्वास
गांधीनगर / वृत्तसंस्था
देशातील संरक्षण उत्पादन व्यवसाय 2025 पर्यंत 22 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहील, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे सुरू असलेल्या डिफेन्स एक्स्पो- 2022 अंतर्गत ‘संरक्षणासाठी गुंतवणूक’ कार्यक्रमात त्यांनी गुंतवणूकदारांना संबोधित केले. समस्यांचे निराकरण करण्यासाठी संकोच न करता संरक्षण मंत्रालयाशी किंवा अधिकाऱयांशी संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संरक्षणमंत्र्यांनी खासगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी पुढे येऊन भारतीय संरक्षण उद्योगात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. केवळ मोठे उद्योगच नव्हे तर स्टार्टअप आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) देखील संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. दिवसेंदिवस या क्षेत्रात नव्या उद्योगांची भर पडत असून देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी हे ‘सुवर्ण युग’ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतीय संरक्षण उद्योग हे भविष्यातील एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. सरकार देशांतर्गत संरक्षण उत्पादन 12 अब्ज डॉलर्सवरून 2025 पर्यंत 22 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण क्षेत्रात संधींची कमतरता नसल्यामुळे गुंतवणुकदारांच्या सहकार्याने आम्ही हे 22 अब्ज डॉलर्सचे लक्ष्यदेखील पार करू, असेही ते म्हणाले. या क्षेत्रातील जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत पुढे जात आहे. संरक्षणविषयक सामुग्री निर्यात करण्यासाठीही सरकारकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जगभरातील अनेक देश भारताकडून संरक्षण सामुग्रीची मागणी करू लागल्याचेही त्यांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रात स्थानिक उत्पादनासाठी केंद्र सरकारने अनेक पावले आणि सुधारणा केल्या आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाचे दरवाजे खासगी क्षेत्रासाठी बंद होते. मात्र, आता स्वेच्छेने पुढाकार घेणाऱयांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाचे संरक्षण आणि आर्थिक सामर्थ्य एकमेकांना पूरक आहेत आणि जेव्हा ते धोक्मयांपासून सुरक्षित असेल तेव्हाच राष्ट्र अधिक प्रगती करेल, असा आशावादही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.