उपग्रह आधारित सेवेची सैन्याकडून सुरुवात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये भारतीय सैन्याने उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू केली आहे. भारतासाठी सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सियाचीनमध्ये उपग्रहीय इंटरनेट सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्यूरी कोअरने 19,061 फुटांच्या उंचीवर जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमीत उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा सुरू झाल्याचे ट्विट करत सांगितले आहे.
फायर अँड फ्यूरी कोअरला चौदावी कोअर देखील म्हटले जाते. कारगिल-लेहमध्ये चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेसह सियाचीन ग्लेशियरमध्ये सुरक्षा आणि देखरेखीची जबाबदारी याच कोअरकडे असते.
सियाचीन जगातील सर्वात अवघड सैन्यक्षेत्र आहे. या सर्वात उंच युद्धभूमीत उपग्रह आधारित इंटरनेटमुळे आता आमच्या शूरवीरांना संपर्कयंत्रणेसाठी मोठी धडपड करावी लागणार नाही. तेथे तैनात शूरवीर आता सहजपणे स्वतःच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधू शकणार आहेत. पूर्वी सियाचीनमध्ये उपग्रहीय फोन हेच माध्यम होते. याचबरोबर इंटरनेट सेवेमुळे या दुर्गम युद्धक्षेत्रात सैन्याची संपर्कयंत्रणा मजबूत झाली आहे. तेथून कुठलीही माहिती त्वरित सैन्यमुख्यालयात पाठविता येणार आहे. सियाचीनमध्ये उपग्रहीय इंटरनेट भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडने (बीबीएनएल) सुरू केले आहे. या सरकारी कंपनीकडे भारत नेट प्रकल्पाची देखील जबाबदारी आहे.
उपग्रह आधारित इंटरनेट सेवा
याप्रकारची इंटरनेट सेवा बिनतारी असते. थेट उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा प्रदान केली जाते. यात रेडिओ वेव्ह्जद्वारे डाटा ट्रान्समिशन होते. एकप्रकारे उपग्रहीय टीव्ही म्हणजेच डायरेक्ट टू होम सेवेप्रमाणे ही सेवा काम करते. उपग्रहीय इंटरनेट सेवेत डिशचा वापर होत असतो.
सियाचीनचे सामरिक महत्त्व
सियाचीन सामरिकदृष्टय़ा भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तानची सीमा तर दुसरीकडे चीन आहे. सियाचीन क्षेत्रातून चीनच्या काराकोरम महामार्गावर सहजपणे नजर ठेवता येते. सियाचीनमधील हाडं गोठविणाऱया थंडीत भारतीय सैनिक दिवसरात्र पहारा देत असतात. हिवाळय़ात येथील तापमान उणे 60 अंश सेल्सिअसपेक्षा खालावत असते. 1984 पूर्वी सियाचीनमध्ये सैन्य तैनात नव्हते. परंतु 80 च्या दशकात पाकिस्तानी सैन्याने यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारताने ‘ऑपरेशन मेघदूत’ राबवून हे क्षेत्र स्वतःच्या नियंत्रणात आणले होते. तेव्हापासूनच भारतीय सैन्य तेथे सदैव तैनात असते.
सैन्याचा स्वतःचा कम्युनिकेशन सॅटेलाइट
भारतीय सैन्याकडे लवकरच स्वतःचा कम्युनिकेशन सॅटेलाइट असणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्वीच जीसॅट-7बी उपग्रहाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा उपग्रह सैन्याच्या संपर्कयंत्रणेला बळकट करणारा ठरणार आहे. सैन्य स्वतःच्या सामरिक आणि संपर्कयंत्रणेच्या गरजांसाठी आतापर्यंत जीसॅट-7ए आणि अन्य उपग्रहांवर निर्भर राहिले आहे. जीसॅट-7ए भारतीय वायुदलासाठी डेडिकेटेड कम्युनिकेशन उपग्रह आहे. परंतु लवकरच भारतीय वायुदलाप्रमाणे सैन्याकडे देखील स्वतःसाठी समर्पित उपग्रह असणार आहे.
खासगी कंपन्यांचाही हातभार
भारतीय सैन्याला पूर्व लडाख सारख्या संवेदनशील सीमांवर काही खासगी कंपन्या देखील उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवत आहेत. ह्युजेस कम्युनिकेशन्स इंडियाने इस्रोसोबत करार केला आहे. या कंपनीने अलिकडेच वाणिज्यिक उपग्रहीय इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. गलवान क्षेत्रासह चीनला लागून असलेल्या सीमेवर सैन्याला या कंपनीकडून उपग्रह आधारित इंटरनेट सेवा प्रदान केली जात आहे.