वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयएस (इस्लामिक स्टेट) या इस्लामी दहशतवादी संघटनेने भारतात हातपाय पसरण्याचे कारस्थान रचले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचरांना मिळाली आहे. यासाठी या संघटनेने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न चालविला आहे. गुवाहाटी विद्यापीठात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तौसीफ अली या विद्यार्थ्याच्या चौकशीतून हा गौप्यस्फोट झाला आहे.
तंत्रज्ञान शिक्षित तरुणांना धर्मांध बनवून त्यांच्या हातून हिंसाचार घडविण्याची योजना या संघटनेने आखली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात कट्टर आणि जहाल धर्मवाद रुजविण्याठी इंटरनेट आणि इतर डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्याचा कट आहे. अशाच माध्यमातून अर्शद वारसी, मोहम्मद शहानवाझ, हारीस फारुखी इत्यादी विद्यार्थ्यांना दहशतवादी बनविण्यात आले. या सर्वांना आता अटक करण्यात आली असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास एनआयए करीत आहे.
देशभरात जाळे
उच्च तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरण्यासाठी देशभरात जाळे पसरविण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. भारतातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांशी या संदर्भात हस्तकांकरवी संपर्क केला जात आहे. जे जाळ्यात अडकतील त्यांना धर्मांधतेचे प्रशिक्षण देऊन त्यांचा उपयोग भारतात दहशत माजविण्यासाठी आणि बहुसंख्याक समाजात भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थ्यांना बहकविण्याचे काम या संघटनेच्या वतीने हारीस फारुखी हा करीत होता, असे तपासातून निष्पन्न झाले आहे.
घटना, व्यवस्थेशी शत्रुत्व
भारताची घटना, राज्यव्यवस्था, बहुसंख्याकांचा म्हणजेच हिंदू धर्म धर्म आणि त्यांची संस्कृती इत्यादींसंदर्भात शत्रुत्वाची भावना या तरुणांमध्ये निर्माण केली जात आहे. आपले ध्येय इस्लामी राज्य स्थापन करणे हे आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तौसिफ फारुखी या तरुणाला अटक केल्यानंतर ही माहिती बाहेर पडली. त्याची इलेक्ट्रॉनिक साधने तपासली असता हा पर्दाफाश झाला.
सावधगिरीची सूचना
तरुणांनी, विशेषत: अल्पसंख्य आणि मुस्लीम समाजातील तरुणांनी या प्रयत्नांपासून सावध रहावे, अशी सूचना एनआयएने केली आहे. आयएसच्या नादाला लागून दहशतवादाचा मार्ग स्वीकारल्यास आपले करिअर उध्वस्त होऊ शकते. कारण, दहशतवादाच्या माध्यमातून कोणतीही मागणी मान्य होऊ शकत नाही. तसेच फार काळ तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या तडाख्यापासून वाचू शकत नाही. म्हणून या जाळ्यापासून सावध रहा, असे आवाहन करण्यात आले आहे.