वृत्तसंस्था/ सुहेल (जर्मनी)
आयएसएसएफ कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गुरूवारी भारताचे नेमबाज इशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे भारताच्या पलक आणि सरबज्योत सिंग यांनी या क्रीडाप्रकारात रौप्यपदक घेतले.
मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजीत इशा सिंग आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीत आपल्याच देशाच्या पलक आणि सरबज्योत सिंग यांचा 16-12 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रमिता आणि पार्थ माखिजा यांनी रौप्यपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारातील सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत पोलंडच्या ज्युलीया आणि व्हिक्टर या जोडीने भारताचा रमिता आणि पार्थ यांचा 17-13 असा पराभव केला. गुरूवारी भारताने या स्पर्धेत तीन पदके मिळविली. स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारताने चार सुवर्णपदकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत फ्रान्स आणि पोलंड यांनीही सुवर्णपदके मिळविली आहेत.