वृत्तसंस्था/ बेंगळूर
आगामी होणाऱया आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणारा रुपिंदर पाल सिंगच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागत आहे. आता या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व वीरेंद्र लाक्राकडे सोपविण्यात आले आहे.
रुपिंदर पाल सिंगने यापूर्वी घेतलेल्या निवृतीच्या निर्णयानंतर त्याने या स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले होते. आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या हॉकी संघाचे सराव शिबीर सुरू असताना रुपिंदर पाल सिंगच्या मनगटाला दुखापत झाल्याची माहिती हॉकी इंडियाने दिली. आता या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 20 जणांच्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व वीरेंद्र लाक्राकडे सोपविण्यात आले असून एस.व्ही.सुनीलकडे उपकर्णधारपद राहील. आशिया चषक हॉकी स्पर्धा 23 मे पासून इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू होणार आहे.