प्रा. गीता मुरकुटे यांचे प्रतिपादन : म. ए. समितीतर्फे जिजाऊ-विवेकानंद जयंती : शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
आजही ग्रामीण भागात महिला, मुलींना स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यांच्यावर काही मर्यादा घातल्या जातात. मात्र, राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श समोर ठेऊन मुलींना घडविले पाहिजे. राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्ने पाहिली आणि ती त्यांनी सत्यात उतरविली. त्यामुळे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांच्या विचारांचा आदर्श युवा पिढीपुढे ठेवला पाहिजे, असे उद्गार प्रमुख वक्त्या प्रा. गीता मुरकुटे यांनी काढले.
तालुका म. ए. समितीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त गुरुवारी मराठा मंदिरमध्ये आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर, म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, माधुरी हेगडे, दत्ता उघाडे, ऍड. एम. जी. पाटील, मनोहर संताजी आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत व महाराष्ट्रगीत सादर केले. प्रमुख वक्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जिजाऊ व विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. दत्ता उघाडे यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
प्रा. मुरकुटे पुढे म्हणाल्या, पालकांनी मुलांच्या कर्तृत्व, कलागुणांवर प्रेम करून त्यांच्या पंखात बळ भरले पाहिजे. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता मुलांना कणखर, बळकट आणि बलवान बनवावे. शिवकाळातील प्रत्येक घटनेत संवाद महत्त्वाचा होता. मात्र, आज मोबाईलमुळे संवाद कमी झाला आहे. त्यामुळे पिढी संस्कारापासून दूर राहत आहे. भौतिक सुविधा आल्या मात्र माणूस माणसापासून दुरावत गेला. अशा परिस्थितीत जिजाऊंचे सदृढ विचारच समाज घडवायला मदत करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. मायाप्पा पाटील म्हणले, जिजाऊंमुळे शिवराय घडले. शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी शिवचरित्र वाचणे काळाजी गरज आहे. शिवरायांना चांगल्या विचारांचे संस्कार जिजाऊ विद्यापीठात मिळाले.
यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर व जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मधुरा गुरव यांनी केले. पुंडलिक पावशे यांनी आभार मानले.
म. ए. युवा समितीवतीने जिजाऊ-स्वामी विवेकानंद जयंती
माराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. युवा समिती कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांनी अभिवादन करून मनोगत व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीची आज युवकांना गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सचिन केळवेकर, विनायक कावळे, राजू कदम, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी आणि महेश चौगुले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले.
महिला आघाडीतर्फे जिजाऊ जयंती
महाराष्ट्र एकीकरण समिती, महिला आघाडीतर्फे गुरुवारी जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर म्हणाल्या, महिलांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. सरिता पाटील म्हणाल्या, जिजाऊंनी स्वराज्याची स्वप्ने बघून ती सत्यात उतरविली. शिवाय शिवरायांना घडविले, असे सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आभार कांचन भातकांडे यांनी मानले.
मराठा मंदिरतर्फे जिजाऊ जयंती साजरी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या जिजाऊमाता आणि तऊणवर्गाचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती मराठा मंदिरच्यावतीने साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव होते.
यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जीवनातील थोडे जरी विचार आपल्या जीवनात आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी मराठा मंदिरचे ट्रस्टी बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल, विश्वास घोरपडे, नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, लक्ष्मण सैनूचे नागेश तरळे, दशरथ ढोबळे व अनिल जांबोटकर उपस्थित होते.