ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यभरातून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही ट्विट करत कोश्यारींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “थोडय़ा दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की, हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा एकदा वाईट बोलले गेले. संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झालं आता बोचंक गुंडाळ!”, असं म्हणत आव्हाड यांनी कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला.
काय म्हणाले होते कोश्यारी?
शनिवारी औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले होते की, गडकरी आणि पवार दोन्ही नेते द्रष्टे आहेत. पीएचडी आणि डि. लीट पदवीपेक्षा त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी महाराज तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य करत गडकरी आणि पवारांची तुलना त्यांनी महापुरुषांशी केली होती.
अधिक वाचा : ‘त्यांना’ महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय, रोहित पवार यांनी घेतला सुधांशू त्रिवेदी यांचा समाचार