भाजपला यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा, काँग्रेसची टीका
ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर २५०० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आपल्याकडं करण्यात आली असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते आणि आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ (BJP MLA Basangouda Patil-Yatnal) यांनी केला आहे. यत्नाळ यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यत्नाळ यांच्या दाव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (Congress State President DK Shivakumar) यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून, कर्नाटकात प्रत्येक कामासाठी दर ठरवले जात असल्याचा आरोपही केला आहे.
गुरुवारी लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना यत्नाळ यांनी दावा केला की, नवी दिल्लीतील काही नेत्यांनी मुख्यमंत्री व्हायचे असल्यास त्याबदल्यात २५०० कोटी द्यावे लागतील. तसेच “त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते.” यत्नाळ यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यत्नाळ यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर आता काँग्रेस पक्षानं (Congress) देखील जोरदार निशाणा साधलाय. भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमारांनी भाजपला (BJP) यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा? असा सवाल उपस्थित केलाय.
काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, आमदार बसनगौडा पाटील- यत्नाळ-यांच्याकडं सर्वकाही उपलब्ध असताना, भाजपला आणखी कोणते पुरावे हवे आहेत? आम्ही कोणाचाही राजीनामा मागत नाहीय. पण, २५०० कोटींच्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर कोणी दिली, हे भाजपनं सांगावं. यत्नाळ हे माजी मंत्री आहेत, त्यामुळं त्यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करू नये, असंही शिवकुमारांनी म्हटलंय. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. तसेच हा राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर देशात चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केलीय.