पिंपरी / प्रतिनिधी :
कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 726 व्या संजीवन समाधी सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत आळंदीत उत्सव सोहळा पार पडणार असून, येत्या रविवारी कार्तिकी एकादशी, तर मंगळवारी संजीवन समाधी सोहळा आहे. यंदा 5 लाखांपेक्षा अधिक भाविक यात्रेला येण्याची शक्यता आहे.
पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरू आहे. सोहळा सुरू होण्यापूर्वीच इंद्रायणीतीरी स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंदे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात 235 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सूचना मिळणार आहेत. यात्रेनिमित्त आलेल्या दिंडय़ांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात येणार असून, 6 हॉकर्स स्कॉड तैनात असतील.
अधिक वाचा : ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा, दाखवले काळे झेंडे
726 वा संजीवन समाधी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मोठय़ा उत्साहात होणार आहे. कोरोनानंतर हा सोहळा निर्बंधमुक्त होणार असल्यामुळे भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, काही अडचण अथवा समस्या आल्यास नजीकच्या पोलीस मदत केंद्र किंवा 112 क्रमांकावर तात्काळ संपर्क साधवा, असे आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ढ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.
अत्यावश्यक वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी
भाविकांच्या वाहनांकरिता पिवळय़ा रंगाचा व स्थानिकांच्या वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असा वेगवेगळे पास तयार करण्यात आले असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांना पाससाठी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान, भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद मरकळ-आळंदी रस्ता बंद असून, भाविकांनी दिंडय़ांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
स्वच्छता आणि आरोग्यसुविधेवर भर
यात्राकाळात 24 तास आरोग्यसुविधा, पाणी, वीज देण्यात येणार आहे. इंद्रायणीचे पाणी दूषित असल्यामुळे भामा आसखेड धरणातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. महिला-पुरुष भाविकांना स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
दुकाने गजबजली
यानिमित्ताने टाळ, पखवाज, फूल-प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हॉटेल्स उभारणी सुरू आहे.