प्रतिनिधी/खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दि. 17 रोजी सकाळी 11 वा. दाखल करणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी दिली. समिती कार्यालयात शनिवारी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सोमवारी सकाळी 11 वाजता चौराशी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी चौराशी मंदिरात जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना यशवंत बिरजे म्हणाले, तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवाराला गावागावातून एकमुखी पाठिंबा मिळतो आहे. राष्ट्रीय पक्षातील बंडाळी पाहता सर्वसामान्य जनतेतून समितीचा उमेदवार निवडून यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोमवारी समिती कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहून मराठी अस्मितेची ताकद दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
समितीत एकी झाल्यानंतर समिती प्रबळ झाल्याने राजकीय पक्षातील नेते अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुरघोडी करू पाहत आहेत. येत्या निवडणुकीत मराठी भाषिक आपला मराठी बाणा दाखवून देतील, असे विचार माजी आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले.
त्यावेळी शंकर गावडे, निरंजन सरदेसाई, नारायण कापोलकर, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, आबासाहेब दळवी, प्रल्हाद मादार, प्रकाश चव्हाण, मऱ्याप्पा पाटील आदींसह उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.