रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला आहे. ज्यांना निवडणुकीचे भविष्य समजते त्यांना स्वतःचे भविष्य समजत असणार असे मानायला हरकत नाही. ओघाने 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि मिशन 370 यासाठी प्रशांत किशोर काँग्रेसचे नेतृत्व करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस हायकमांडने प्रशांत यांना उच्चाधिकार समितीत सदस्य व निवडणूक रचना प्रमुख म्हणून स्थान देण्यास हिरवा कंदील दाखवला पण काँग्रेस पक्षात अमर्याद अधिकार देण्यास विरोध केला. ओघानेच चर्चा फिसकटली आणि प्रशांत यांनी काँग्रेस पक्ष प्रवेशास नकार दिला. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला व प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ट्विट करुन भूमिका स्पष्ट केल्या. आणि प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार, मोठे पद घेणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला. गेले काही दिवस काँग्रेस कात टाकण्याच्या मनस्थितीत आहे, अशी चर्चा होती आणि काँग्रेसने प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतला होता. काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या समवेत प्रशांत किशोर यांची चर्चा-बैठक झाली. किशोर यांनी सोनिया गांधींना काँग्रेस विजयाचा फॉर्म्युला सांगितला. प्रेझेंटेशन दिले. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांसमवेतही प्रशांत यांची चर्चा झाली. काँग्रेसची सत्ता असलेल्या काही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी प्रशांत यांच्या सूचनांचे स्वागत केले. अशा वार्ता आल्याने पराभवाने खचलेले कार्यकर्ते उत्साहात होते. कार्यकर्त्यांना नेहमी विजय मिळवून देणारा नेता हवा असतो. काँग्रेस नेतृत्वाने दगडाला शेंदूर फासला आणि तो विजयी झाला असे अनेक दाखले आहेत. ओघाने काँग्रेसमध्ये विजयासाठी काही हालचाली होत आहेत याचे स्वागत होताना दिसत होते. किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन महत्वाचे पद व अधिकार दिले जाणार असेही बोलले जात होते. काँग्रेस प्रवेशाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. पण माशी मध्येच शिंकली आणि अखेरच्या क्षणी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशास नकार दिला. वरवर हे सारे सहज, सोपे वाटत असले तरी ते तसे नाही व नव्हते. ज्यांना काँग्रेस पक्ष, त्यांची कार्यपद्धती, निर्णयशैली, पक्षातील घराणेशाही आणि बडे-बुजुर्ग नेते यांची माहिती आहे त्यांना प्रशांत किशोर यांच्या नकाराचे कौतुक नसणार. काल आला आणि डोक्यावर बसला असे काँग्रेसमध्ये होत नाही. काँग्रेस आपली प्रतिमा जपत आली आहे आणि पद,अधिकार देताना संबंधित व्यक्तीचे रेकॉर्ड तपासले जाते. प्रशांत किशोर हे व्यावसायिक सल्लागार आहेत. त्यांनी भाजपापासून शिवसेनेपर्यंत आणि नितीश कुमारांपासून अनेकांना व्यावसायिक सेवा दिली आहे. रणनितीकार म्हणून त्यांचे नाव झाले असले तरी काँग्रेसकडे असे पाच-पन्नास प्रशांत आहेत. त्यांना अधिकार व संधी मिळायला हवी, निर्णय घेण्याचे गतीने ते राबवण्याचे अधिकार हवेत. ते मिळत नाहीत हीच ओरड आहे. ओघाने याच मुद्यावर प्रशांत यांनी प्रवेशास नकार दिला. प्रशांत किशोर हे जाती-पातीचे, इश्यूचे आणि राजकीय गणिते आखून विजयाचे राजकारण करण्यासाठी सल्ला देणारे गृहस्थ आहेत. त्यांची मोठी टीम कार्यरत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ज्या 270 जागेवर दुसऱया क्रमांकावर होते त्या जागा जिंकण्याचा फॉर्म्युला त्यांनी सादर केला होता. काँग्रेसने शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्याशी मैत्री करावी वगैरे प्लॅन त्यांनी पुढे आणले होते. पण काँग्रेसच्या दरबारी राजकारणात प्रशांत यांना अमर्याद अधिकार देण्यास नकार दिला आणि ते स्वाभाविक आहे. दीर्घ परंपरा, अनुभव असलेल्या पक्षात एखाद्याचा सल्ला घेतला जाऊ शकतो. पण पक्ष ताब्यात दिला जात नाही. ओघानेच किशोर यांची योजना फसली आहे. प्रशांत यांनी पक्षाला गांधी कुटुंबीयांबाहेरचा पूर्ण वेळ अध्यक्ष, महागाई-बेरोजगारी यावर राष्ट्रव्यापी आंदोलन, पक्षाची फेररचना, महाराष्ट्र, पंजाब, बंगाल येथे युती वगैरे सूचना केल्या होत्या. काँग्रेस पक्षात या व अशा सुधारणांचा आग्रह धरणारा गट आहे. तो गट अधून-मधून लेटरबॉम्ब टाकत असतो. हे जुने-जाणते नेते तरबेज आहेत. त्यांना अधिकार हवे आहेत. पण पक्षात मोकळीक आणि जिंकण्याची सामुदायिक इच्छाशक्ती यांची उणीव दिसते आहे. पक्षातील ही उणीव सर्वांना माहिती आहे. राहूल गांधी पक्षासाठी पूर्णवेळ देत नाहीत, अशीही तक्रार आहे. प्रशांत यांनी या उणीवेवर बोट ठेऊन काँग्रेस प्रवेशास नकार दिला. काँग्रेसमधून फुटून प्रादेशिक पातळीवर काम करणारे लहान-मोठे पक्ष सोबत घेणे, जातीय, धर्मांध आणि डांगी नेते सोबत घेणे, काँग्रेसला जड जाते आहे. काँग्रेससाठी पूर्णवेळ कार्यकर्ते हवे आहेत. पण तशी रचना झाली नाही. राजकारण हा धंदा आणि समाजसेवा ही दुकानदारी झाली असताना असे निरपेक्ष सेवाभावी कार्यकर्ते मिळणे हे स्वप्नरंजन आहे. विविध राजकीय पक्षांनी धर्म, जात, पोटजात यावर आधारित मतपेटय़ा बांधल्या आहेत. त्यांचीही काँग्रेसला अडचण येते आहे. पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. गावागावात काँग्रेसचा विचार व कार्यकर्ता आहे. भाजपाने काँग्रेसला नामोहरम करण्याची प्रत्येक संधी उचलली आहे. शतप्रतिशत भाजपा हा भाजपचा कार्यक्रम आहे. उत्तर प्रदेशाची सत्ता आणि पाच राज्यात बरे यश आल्याने भाजपा सरसावली आहे. राजकारणात दोन अधिक दोन बरोबर चार असे सरळ गणित असत नाही. भारतीय मतदार गरीब, अल्पशिक्षित व विविध जाती-पातीत विभागला आहे. त्याला गृहीत धरुन कोणालाच निवडणुकीची गणिते ठरवता येत नाहीत. मतदारांनी भल्याभल्यांना आस्मान दाखवले आहे. त्यामुळे राजकीय रणनीती, सल्ले, जातीय मतपेटय़ा आणि नौटंकी कुणीही किती केली तरी मतदार हुशार आहे. नेतृत्वाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. देश महाशक्ती व्हावा. देशापुढचे वर्षानुवर्षे असलेले प्रश्न मार्गी लागावेत अशी त्यांची इच्छा आहे. प्रशांत यांचे सल्ला देण्याचे दुकान आहे. काँग्रेस त्यांचा तेवढय़ापुरता उपयोग करणार हे ओघाने आलेच. काँग्रेसला अडवून काही मिळवू, पक्षात मोठे स्थान पटकावू असे त्यांना वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. काँग्रेसने विजयाच्या दिशेने इच्छाशक्ती व्यक्त केली त्यासाठी हालचाली चालू केल्या हे सुद्धा स्वागतार्ह आहे. लोकशाहीत सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष बळकट हवा तरच कारभार चांगला सुरु होतो. काँग्रेस आता काय करते ते बघायचे.
Previous Articleरिलेशनशिपमध्ये आहे अवनीत कौर
Next Article युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार जर्मनी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.