मित्रहो, ह्यापूर्वी आपण महाकवी कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा परिचय करून घेतला. कालिदासाच्या सर्वच कलाकृती गाजल्या. मेघदूत हे खंडकाव्य मात्र निखळ काव्य आहे. त्यात असलेली कथा ही दोन-चार ओळींचीच आहे. पण बाकीचे वर्णन निसर्गासंबंधी, विविध स्थलांसंबंधीचे आणि मुख्य म्हणजे तपशीलवर आणि खास कालिदासाच्या भाषावैशिष्टय़ाने ओतप्रोत आहे.
मेघदूत काव्य म्हणजे सरस्वतीच्या कंठातील नीलमणीच! यात कालिदासाची स्वैर आणि विलासी कल्पना मेघाचे रूप घेऊन अंतराळात भराऱया मारत आहे. एका छोटय़ा प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर केवळ कल्पनेच्या कुंचल्याने एकच पात्र आणि एकच भावना इतक्मया कौशल्याने रंगवलीय की, त्यात रामगिरीपासून हिमालयापर्यंतच्या, इतिहास, भूगोलाचे अनेक चित्रपट आणि विरही दाम्पत्याच्या भावनांचे विविध रंग वाचकाला दिसू लागतात. त्या स्थलांचा रसास्वाद घेताना वाचक रमतात. नद्या, पर्वत, नगरे, विद्याधर, गंधर्व, शिवपार्वती, यक्ष इत्यादींचे वर्णन करताना त्यांच्याशी मेघाचा संबंध कालिदासाने अगदी यथोचित शब्दांत जोडला आहे. त्या ओघात प्रसंगानुसार येणारी सुभाषिते हादेखील काव्याचा दुसरा एक विशेष भाग आहे.
विरही जनाच्या मनात समुद्राच्या भावनांचे गोड वर्णन मेघाइतके अन्यत्र क्वचितच सापडेल. मेघदूत हे एक अप्रतिम खंडकाव्य आहे. खंडकाव्यात बहुदा एकच प्रसंग एकाच स्थळी घडलेला असतो. मेघदूतातही तसेच आहे. त्यातील मानवी स्वभाव, निसर्गाचे वर्णन, भाषासौ÷व, कर्णमधुर काव्यवृत्ते या सर्वांचा सुंदर संगम झाला आहे.
काहींच्या मते मेघदूतात कालिदासाने स्वतःचे चरित्र गुंफले आहे. राजाच्या अवकृपेने कालिदासावर देश सोडून जाण्याचा प्रसंग आला असावा आणि तो त्याने यक्षाचा म्हणून वर्णन केला असावा. तर कोणी म्हणतात रामायणातील एका प्रसंगावरून बेतलेला असावा. ह्या सुंदर आणि रमणीय काव्याला केलिकाव्य किंवा क्रिडाकाव्य असेही म्हणतात.