7 नोव्हेंबरला 22 वी ऊस परिषद; 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान आत्मक्लेश आंदोलन; 22 दिवस चालणार आंदोलन
कोल्हापूर प्रतिनिधी
गत वर्षीच्या गाळप हंगामातील 400 रुपयेंचा हप्ता दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नसून यापुढे सर्व साखर कारखान्यांतील साखर विक्री रोखणार असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ऊस दरासाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू असे स्पष्ट करून त्यांनी आगामी आंदोलनाची रणनीती कशी असेल याबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘स्वाभिमानी’ची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी निश्चित केली असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू असेल, असेही शेट्टी यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार बैठकीत जाहीर केले.
साखर विक्री रोखणार
राजू शेट्टी म्हणाले, ऊस दराच्या आगामी लढाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रणशिंग फुंकले आहे. संघटनेच्यावतीने 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान साखर कारखान्यांवर पायी 522 किलोमीटर चालून आत्मक्लेश करण्यात येईल. स्वाभिमानी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 2 ऑक्टोबरपासून 400 रूपयांचा दुसरा पता मिळेपर्यंत साखर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नाही. यावेळी वाहतूक करणाऱ्या बांधवांनी सुद्धा वाहतूक करू नये. आंदोलनामध्ये होणाऱ्या नुकसानीसाठी ते स्वत: जबाबदार असतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. गेल्यावर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. यावर्षी साखरेच्या दराचे आंदोलन गांधीगिरीच्या मार्गाने करणार आहे. आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 17 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे. 22 दिवस हे आंदोलन सुरू असेल.
कर्नाटकातही ‘स्वाभिमानी’ करणार आंदोलन
कर्नाटकातील साखर कारखान्यांना देखील तोच नियम लावणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. 10 ऑक्टोबर रोजी कर्नाटकात देखील आंदोलन करणार आहे. कर्नाटकमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी आणि कर्नाटक रयत संघाच्यावतीने आंदोलन असणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन
सोमवारी (2 ऑक्टोबर) कोल्हापूर जिह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रत्येक कारखान्याच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद साखर कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून 400 रूपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. ऊस निर्यातबंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते.