सन २०१३ ला गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक झालेल्या लाठीचार्ज खटल्यातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि खंडोबा तालमीच्या कार्यकर्त्यांची मे.जिल्हा सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. गेली सुमारे ९ वर्षे या खटल्याचे काम सुरु होते. आज जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश साळुंखे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये सबळ पुराव्या अभावी राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात या खटल्यातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
सन २०१३ च्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत पोलीस प्रशासनाकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आरेरावी, दडपशाहीच्या घटना सकाळ पासूनच सुरु होत्या. रात्री खंडोबा तालमीची मिरवणूक शिवसेनेच्या पान- सुपारी मंडपासमोर आल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक ज्योतीप्रियासिंग आणि करवीर डीवायएसपी वैशाली माने यांच्या आदेशाने अचानक लाठीचार्ज करण्यात आले. लाठीचार्ज विरोधात रस्त्यावर उतरलेल्या राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याचबरोबर राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर विनयभंग यासारखी कलमे लावण्यात आली येऊन त्यांना १५ ते २० दिवस कारागृहात डांबण्यात आले होते. याबाबत राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळात आवाज उठवून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक ज्योतीप्रियासिंग यांना महाराष्ट्रातून केडर सोडण्यास भाग पाडले होते.
खटल्याच्या सुनावणीनंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, परराज्यातील काही मुजोर पोलीस अधिकारी हे महाराष्ट्रातील जनतेला कवडीमोल समजतात. ज्या पद्धतीने श्रीमती ज्योतीप्रियासिंग यांनी बेफाम लाठीहल्ला करून कार्यकर्त्यांना गंभीर जखमी केले. न्यायाच्या मंदिरात “देर हे लेकीन अंधेर नही” याचा प्रत्यय पुन्हा आला असून, राजर्षी शाहू महाराजांच्या स्वाभिमानाच्या शिकवणीप्रमाणे या प्रकरणात लढलो आणि यश आले.” असे म्हटले आहे.