लोकल फॉर ग्लोबलचा दिला नारा, गोव्याचे कौतुक
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात दरवर्षी आयोजित करण्यात येणारा लोकोत्सव हा लोकमनाची जीवंत भावना आहे. म्हणूनच देशातील सर्व राज्यातील बांधव या ठिकाणी येऊन आपली कलासंस्कृती, खाद्यसंस्कृती, कारागिरीचे दर्शन घडवतात. भारत हे जगातील श्रेष्ठ राष्ट्र बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकल फॉर व्होकलचा नारा दिला होता. म्हणजे सर्व राज्यांची कला, उत्पादने ही जगात आदर्श ठरावीत यासाठी हा प्रत्यत्न होता. गोव्यात लोकोत्सवाच्या माध्यमातून हा नारा यशस्वी ठरत असल्याचे माझे मत असून, सर्व राज्यांचे उत्पादन, कारागिरी यांची आयात-निर्यातहोत असल्याने यातून आत्मनिर्भर भारत होत आहे. या महोत्सवामुळे लोकल फॉर ग्लोबलचे महत्त्व वाढल्याचे उद्गार राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी काढले.
कला अकादमीच्या परिसरातील दर्या संगमानवर आयोजित करण्यात लोकोत्सव 2023 महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल मिश्र बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंद, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव मिनीनो डिसोझा, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र उदयपूरचे संचालक किरण सोनी गुप्ता उपस्थित होते.
राज्यपाल मिश्र म्हणाले, भारतातील प्रत्येक प्रदेशात भाषा, संस्कृती याबाबत विविधता असली तरी एकतेचे दर्शन होते. याचे कारण म्हणजे भारत हा संस्कृतीप्रिय देश आहे. या देशाची संस्कृती सर्व जगात आदर्शवादी असल्यानेच आज गोव्यासारख्या ठिकाणी लोकोत्सवासारखा लोकमनाची भावना असलेला उत्सव यशस्वीरित्या साजरा होत आहे. गोवा सरकार हे इतर राज्यांसाठी प्रेरणादायी राज्य असल्याने हा उत्सव म्हणजे सर्व राज्यातील कारागिर, हस्तकला, कलाकार यांच्यासाठी ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारा महोत्सव आहे. याद्वारेच भारत हा आत्मनिर्भर बनणार असून, लोकल फॉर व्होकलचा नाराही यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, राज्यात गेल्या 21 वर्षांपासून लोकोत्सव साजरा होत असून, यंदाचा ह्या लोकोत्सवाचे 22वे वर्ष आहे. ह्या लोकोत्सवात लोकसंगम, कलासंगम पहायवयास मिळतो. हा लोकोत्सव यशस्वी होण्यामागे कला आणि संस्कृती खात्याचे मोठे कष्ट असल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न ह्या लोकोत्सवामुळे पूर्ण होणार आहे. गोवा सरकार हे अंत्योदय विचारधारेतून प्रगती साधत आहे. कारण स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे मिशन लागू करताना आम्ही ग्रामीण भागालाही तितकेच महत्त्व दिले आहे. त्यामुळे लोकल ते व्होकल हा नारा यशस्वी होऊन आता लोकल ते ग्लोबलपर्यंत मजर मारण्यास सज्ज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना समई व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राजस्थानचे राज्यपाल मिश्र यांनी समई प्रज्वलित करून लोकोत्सवाचे उद्घाटन केले. सौ. च्यारी यांनी सूत्रसंचालन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र उदयपूरचे संचालक किरण सोनी गुप्ता यांनी आभार मानले.
लोकोत्सवाचा आजचा पहिला दिवस असल्याने अजूनही स्टॉल थाटण्याचेच काम सुरू होते. त्यामुळे लोकोत्सवाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी अगदी तुरळक प्रमाणात होती.
व्यावसायिकांना प्रोत्साहन द्या
गोव्यात दरवर्षी साजरा होणारा लोकोत्सव हा गोव्याची परंपरा, संस्कृती वाढणारा व जतन करणारा महोत्सव ठरत आहे. या ठिकाणी देशातील विविध राज्यातील हस्तकला, कारागिरी, खादी कपडे विक्रेते, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या सर्वांकडून आपण जे काही खरेदी करतो तो ठरलेल्या दराप्रमाणे घ्यावेत. दर पाडून (कमी करून) साहित्याची विक्री केल्यास परराज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसतो. म्हणून लोकोत्सवाला पाठबळ मिळण्यासाठी, ह्या महोत्सवाची देशपातळीवर वाहवा होण्यासाठी व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठरलेल्या दरातच सामान खरेदी करावे, असे आवाहन कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
राजस्थानच्या कलाकारांनी गाजविला पहिला दिवस
यंदाचा लोकोत्सव हा 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात आला असून, आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात राजस्थानच्या कलाकारांनी पहिला दिवस गाजवला. कारण आजच्या पहिल्याच दिवशी एकट्या राजस्थानला चार कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यात राजस्थानतर्फे कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘मांगणीयार’ हे स्वागतगीत सादर करण्यात आले. त्यानंतर गोव्याचे पारंपरिक समई नृत्य झाले. त्यानंतर राजस्थानच्या कलाकारांनी भवाई नृत्य व रॅम्प वॉक सादर केले. ओडिशा राज्याने ‘गोटिपुआ’ ही कला सादर केली. त्यानंतर राजस्थानने कालबेलिया हा कार्यक्रम घएतला. मणिपूर राज्याने ‘पुंग ढोल चोलम’ सादर केले. त्यानंतर उत्तरप्रदेशने मयूर भंज – चरकुला ही कला सादर केली. आसाम राज्याने बिहू नृत्य सादर केले. पश्चिम बंगाल राज्याने पुऊलीया छाऊ हा कलाप्रकार सादर केला आणि शेवटी गुजरात राज्याने ‘मेवासी’ ही कला सादर केली.