कराड तालुक्यातील वाघेरीतील बैलाचा मृत्यू
वार्ताहर/ कराड, सातारा
गुजराथ, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यात धुमाकूळ घातेल्या जनावरांतील लम्पी आजाराने सातारा जिल्हय़ात प्रवेश केला असून आतापर्यंत जिल्हय़ातील जवळपास 72 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. सोमवारी कराड तालुक्यातील वाघेरी येथील एका बैलाचा लम्पीने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जिल्हय़ाचा पशुवैद्यकीय विभाग व शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची टिम वाघेरीत दाखल झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार बाळासाहेब पाटील यांनीही वाघेरी येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन पशुवैद्यकीय विभागाला सूचना केल्या.
सध्या जनावरांमध्ये लंम्पी हा आजार अधिक प्रमाणात फैलावताना दिसत आहे. पशुविभाग ही सध्या सतर्क झाला असुन संबंधीतांना आपल्या जणावरांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी खटाव तालुक्यात दोन व फलटण येथे दोन जणावरांना या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या जणावरांना आयसोलेशन ही करण्यात आले आहे. जिल्हय़ात लम्पी रोगाची लागन झालेल्या जणावरांची आकडेवारी पाहता यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सोमवारी अखेर पर्यंत एकुण 72 जणावरांना याची लागण झाली असुन यामध्ये 62 गायी व 10 बैलांचा समावेश आहे. तसेच जिल्हय़ात एकुण 13 आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहेत.
सातारा, फलटण, खटाव व कराड तालुक्यातील नऊ गावांतील जवळपास 55 जनावरांना लम्पी या चर्मरोग आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या पशुवैद्यकीय विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. बाधित जनावरांच्या उपचारासह परिसरातील जनावरांचा सर्व्हे करण्यात येत आहे. तसेच बाधित गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.
तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गांतर्फे संबंधीत भागात जावुन पहाणी करण्यात येत आहे. तसेच एखाद्या भागात जर लम्पी आजाराने ग्रासलेले जणावर निदर्शनास आले तर त्याचे पाच किला. मीटर अंतरावर आयसोलेशन करून गावातील इतर जणावरांचे 100 टक्के लसीकरण करून घेण्यात येत आहे. तरी जणावरांमध्ये या आजाराबाबतची कोणतीही लक्षणे आढळुन आल्यास त्वरीत पशुविभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी सुचना पशुविभागीय अधिकारी वर्गातर्फे करण्यात आल्या आहेत.
वाघेरी प्रार्दुभाव वाढला
वाघेरी येथील जवळपास 11 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. यात गाई व बैलांचा सामावेश आहे. यातील जवळपास 10 जनावरे बरी झाली असून तीन नवीन जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तसेच लम्पीची लागण झालेल्या सुलतान पटेल यांच्या बैलाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दुर्गादास उंडगावकर, पशुसंवर्धन साहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्यासह शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पथक वाघेरीत दाखल झाले आहे.
अधिकारी व पथकाच्या उपस्थितीत मृत बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच नवीन लागण झालेल्या तीन जनावरांची तपासणी व उपचार करण्यात आले. गावातील 866 जनावरांना यापूर्वीच लसीकरण करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दोन गाईंचा लम्पीने मृत्यू झाल्याचा सरपंच मज्जिद पटेल यांचा दावा
वाघेरीचे सरपंच मज्जिद पटेल यांच्या एकूण पाच गाईंना लम्पी आजाराची लागण झाली होती. यातील दोन गाईंचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याचा दावा सरपंच मज्जिद पटेल यांनी केला आहे. तर अद्याप तीन गाईंवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. याबाबत पशुसंवर्धन विभागास वारंवार सांगूनही दखल घेतली नसल्याने वरिष्ठ कार्यालयाला निवेदन देणार असल्याचे मज्जिद पटेल म्हणाले.