ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आपल्याकडे पूर्ण संख्याबळ आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच राज्यातील परिस्थिती स्पष्ट होईल. आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्य गडकरींनी केलं आहे. त्यामुळे आता नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) या वक्तव्याने नवीन चर्चांचा उधाण आले आहे.
“मला वाटते की महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता है क्या. आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल. वैयक्तिक संबंध हे राजकाराणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असते,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून ते म्हणाले की, सरकारे येतात आणि जातात, पंतप्रधान येत राहतात, पण हा देश राहिला पाहिजे. देशासाठी काम केले पाहिजे.
बाळासाहेबांचे माझ्यावर प्रेम
मी मंत्री असताना मला त्यांचे खूप सहकार्य लाभले होते. “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आहे. त्यांचे माझ्यावर प्रेम होते. मुंबईतील विकासकामांसाठी त्यांनी मला भरपूर मदत केली होती. मी तेव्हाही त्यांचा आदर करत होतो आजही करतो. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपाला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही त्यांच्या गोष्टी आहेत तर काही आमच्या. हे सुरुच राहणार आहे. भाजपा आणि शिवसेना एकत्र आली तर मला आनंद होईल. पण आज ती परिस्थिती खूप लांब असल्याचे दिसत आहे. पुढे काय आहे हे देवालाच माहिती असेल. याचे उत्तर येणारा काळच देईल, असे नितीन गडकरी म्हणाले.