आरबीआय गव्हर्नरांचा बँकांना संदेश : निवडक बँकांमधील अस्थिरतेवरून चिंता
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी देशातील बँकांसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश दास यांनी बँकांना दिला आहे. निवडक बँकांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर काही प्रमाणात चिंता निर्माण होत असून यामुळे बँकांमध्ये अस्थिरतेची स्थिती उद्भवू शकते असे गव्हर्नरांनी म्हटले आहे.
भविष्यात पूर्ण देशाच्या बँकिंग सेक्टरसाठी अस्थिरतेचे कारण ठरू शकते अशा घटकांवर बँकांचे संचालक मंडळ तसेच व्यवस्थापनाने लक्ष द्यावे. जनतेच्या ठेवींबद्दल असुरक्षितता निर्माण होऊ देऊ नये, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नमूद केले आहे.
बँकिंग सेक्टरची मजबुती कायम ठेवण्यासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरणाऱ्या घटकांची त्वरित ओळख पटविण्यात यावी. अमेरिकेतील बँकिंग संकट पाहून भारताला सतर्कतेची भूमिका स्वीकारावी लागणार असल्याचे दास यांनी केंद्रीय बँकांच्या संचालकांसाठी आयोजित एका परिषदेत बोलताना म्हटले आहे.
दिशानिर्देशांचे पालन आवश्यक
मजबूत शासकीय रचनेची चौकट कुठल्याही देशाच्या बँकिंग सेक्टरसाठी सर्वात महत्त्वाची असते. याचमुळे देशातील बँकांनी आरबीआयकडून मिळालेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे असा संदेश गव्हर्नर दास यांनी दिला आहे. बँकांनी 7 महत्त्वाच्या थीम्सवर काम करणे आवश्यक असून याद्वारेच देशातील बँका मजबुतीने टिकून राहू शकतात. काही बँका आरबीआय दिशानिर्देशांचे पालन करण्यास टाळाटाळ करत आहेत, हा प्रकार भविष्यात बँकिंग सेक्टरसाठी अस्थिर वातावरणाचे कारण ठरू शकतो असा इशारा दास यांनी दिला आहे.