शरद पवारांची एव्हढी काळजी आहे तर नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांनाच पंतप्रधान करावं असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी कधीच मिळाली नाही, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांना संबोधित करताना केले होते.
मंगळवारी महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे उदाहरण देऊन त्यांच्याबद्दल भाष्य़ केले. आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेसवर आरोप करताना काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. शरद पवार आणि काँग्रेसने आजपर्यंत अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं,” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या विधानानंतर राज्यासह देशात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर भाष्य केलं आहे. नाशिकमधून माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधानांच्या मनात शरद पवारांविषयी एवढी काळजी आहे, तर त्यांनी शरद पवारांनाच पंतप्रधान बनवावे.” असे म्हणून त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी मणिपूर, बेरोजगारी, शेतकरी, गरीबी, महागाई या विषय़ांवर बोललं पाहिजे. गेली नऊ वर्षे झाले देशातील जनता राजकीय भाषण ऐकत असून ती आता ‘मन की बात’ ऐकण्यास तयार नाहीत. मणिपूर पेटत असताना पंतप्रधान मौन ठेवत आहेत. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही.” असेही ते म्हणाले.