जांबोटी-कणकुंबी भागातील पंचायत कार्यक्षेत्रातील गावांची बैठक, रस्ताकाम विरोधाला आवाहन देणार
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला रस्ता कर्नाटकातून गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणून नव्याने प्रवर्तीत केलेला क्र. 748-ए-ए या रस्त्याच्या कामाला पर्यावरण वाद्यानी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बेळगाव, चोर्ला मार्गाचे काम रखडणार असल्याची चिन्हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या भागातील गावकऱयांनी किंवा ग्रामस्थानी पर्यावरण वाद्यांच्या या विरोधाला आव्हान देण्याचे ठरविले असून याबाबत विचारविनिमयासाठी जांबोटी-कणकुंबी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांची व्यापक बैठक शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता बोलावली आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे कार्यकर्ते किरण गावडे, लक्ष्मण कसर्लेकर यांनी केले आहे.
बेळगाव-चोर्ला मार्ग गोव्याला जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग असल्याने हा मार्ग विकसित झाल्यापासून या मार्गावरुन गोव्याहून अन्य राज्यांना मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे हा रस्ता सर्वाना सोयीचा झाला आहे. गेल्या 20 वर्षापूर्वी हा रस्ता तयार केला होता. गोवा हद्दीपर्यंत हा रस्ता अत्यंत सुस्थितीत आहे. मात्र कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून बेळगावपर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावरुन वाहतूक करणे जोखमीचे झाले आहे.
येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरवात
गेल्या दोन वर्षापासून हा रस्ता नव्याने निर्माण करण्यात यावा, या मागणीला जोर धरला होता. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने हा रस्ता महामार्गात परिवर्तीत करुन याचा 748-ए-ए असे नामकरण केले आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यानंतर या रस्त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी योजना आखली असून यासाठी 220 कोटी रु. चा निधी मंजूर केला आहे. त्या दृष्टीने रस्ता बांधणीच्या कामाची तांत्रिक बाबी पूर्ण होवून रस्ता तयार करण्याचे काम सुरू होण्याच्या स्थितीत आहे. यासाठी कंत्राटदराने संपूर्ण यंत्रसाम्रगी आमटेजवळ बसविली असून येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
मात्र काही पर्यावरणवादी राम कुलकर्णी आणि गिरीधर कुलकर्णी यांनी या रस्त्याच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे तसेच पर्यावरण लवादाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला आडकाठी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चोर्ला ते बेळगावपर्यंतचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले आहे.
याबाबत बोलताना किरण गावडे म्हणाले, पर्यावरणवादी बेंगळूर अथवा कुठल्या तरी बाहेरच्या मोठय़ा शहरात राहून पर्यावरणावरील प्रेम दाखवतात. मात्र या भागातील नागरिक, शेतकरी व जनता पर्यावरणाचा सांभाळ करत असले जीवन जगत आहेत. या भागातील लोकांना उत्तम रस्ते असणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणवाद्यानी या भागाचा अभ्यास करावा, या परिसरातील दुर्गंम भागात राहणारे लोक आपले जीवन कोणत्या पद्धतीने जगतात. याचा अनुभव घ्यावा. पर्यावरण वाद्यानी संपूर्ण चौकशी करुन या भागातील जनतेशी चर्चा करुन नंतरच विरोधात पाऊल उचलावे.
बेळगाव-गोवा व्हाया रामनगर रस्ता होताना काही पर्यावरणवाद्यानी काम सुरू झाल्यावर न्यायालयात धाव घेऊन रामनगर-खानापूर हे बांधकाम गेली पाच वर्षे बंद पडले. नुकताच सर्वोच्च न्यायालयातून या रस्त्याच्या बांधकामास परवानगी मिळाली आहे. मात्र ठेकेदारांच्या अडचणीमुळे काम अद्याप सुरू झाले नाही.
विरोध करताना सर्व बाबींचा विचार करा
गेल्या अनेक दशकापासून हे लोक रस्ता नसल्याने विकास व शिक्षणापासून वंचित होते. गेल्या 20 वर्षापूर्वी रस्ता सुविधा झाल्यापासून लोकांचे जीवनमान सुधारले आहे. यासाठी विरोध करताना सर्व बाबींचा विचार करण्यात यावा, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
रस्ता खराब असल्यामुळे अपघातांची मालिका सतत सुरू
बेळगाव-चोर्ला हा रस्ता गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे निकामी झाला असून या रस्त्यावरुन अन्य राज्यांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असते. गेल्या वर्षभरात रस्ता खराब असल्यामुळे अपघातांची मालिका सतत सुरू आहे. बेळगाव-चोर्ला रस्त्यावर गेल्या दहा दिवसात झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.