जागोजागी कचरा-मातीचे ढिगारे, रस्त्याचे सौंदर्य धोक्मयात
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील मिलिटरी फार्म ते महात्मा गांधी पुतळय़ापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी कचरा आणि मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. त्यामुळे मिलिटरी फार्म मार्गाला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने हिरवीगार झाडे असणाऱया रस्त्याच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. मिलिटरी प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. संबंधितांनी रस्त्याचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
बेळगावपासून कोकणला जोडणाऱया बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलिटरी फार्मजवळील मार्गावर जागोजागी कचरा, घरगुती टाकाऊ साहित्य, मेलेली जनावरे, मटण-चिकन दुकानातील टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक पिशव्या यामुळे अस्वच्छता पसरली आहे.
याबरोबरच काही ठिकाणी मातीचे ढीगही टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण होत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही बेजबाबदार नागरिक हे गैरप्रकार करत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या सौंदर्याला धोका निर्माण झाला
आहे.
याबरोबरच रस्त्याच्या शेजारी बाटल्या, प्लास्टिक, गंजलेले पत्रे व इतर साहित्य टाकण्यात आल्याने रस्त्याच्या बाजूने चालणेदेखील धोक्मयाचे बनले
आहे.
या मार्गावर सतत वाहनांची ये-जा असते. शिवाय शाळा-महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांचीदेखील वर्दळ असते. मात्र, काही बेजबाबदार नागरिक रस्त्यावरच कचरा आणि माती टाकत असल्याने विद्यार्थ्यांसमोर आपण कोणता आदर्श ठेवत आहोत? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर
गाडा आणि हॉटेलमधील खरकटे रस्त्याशेजारी टाकण्यात येत असल्याने त्यावर ताव मारण्यासाठी भटकी जनावरे आणि कुत्री तुटून पडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याशेजारील कचरा आणि मातीची उचल करून रस्त्याचे सौंदर्य अबाधित ठेवावे, अशी मागणी होऊ लागली आहे.