हिंदू परंपरेनुसार बांगडय़ा किंवा चुडे परिधान करणे ही बाब सांस्कृतिक ठेवा मानली जाते. बिहारमधील मधुबनी येथे राहणाऱया सीतादेवी यांनी या परंपरेला आपला आर्थिक आधार बनविले असून घरचे अठरा विश्वे दारिद्रय़े बांगडय़ांच्या व्यवसायातून दूर करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सीतादेवी यांचा विवाह सुखन शाह यांच्याशी त्यांच्या बालपणीच झाला. माहेर आणि सासर दोन्हीकडे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. पतीचे पोट हातावरचे असल्याने आज जेवायला मिळाले तर उद्या मिळेल की नाही? हा प्रश्न पडत असे. त्यामुळे सीतादेवी यांना काही ना काही रोजगार मिळविणे भाग होते. बांगडय़ा विकण्याचा पतीच्या घराण्याचा व्यवसाय होता. तथापि, त्यातून अत्यल्प प्राप्ती होत असे. मार्केटिंग इत्यादी आधुनिक संकल्पनांची काहीही कल्पना त्यांना नव्हती.
तथापि, सीतादेवींनी हाच व्यवसाय भरभराटीला आणण्याचा निर्धार केला. बांगडय़ा तयार करण्याची कला त्या शिकल्या. नव्या काळाच्या नव्या मागणीनुसार त्यांनी पारंपरिक बांगडी डिझाईनमध्ये बरेच बदल केले. नव्या डिझाईनच्या आणि नव्या शैलीच्या तसेच वैविध्य असणाऱया बांगडय़ा तयार करण्याचे कौशल्य त्यांनी प्राप्त केले. आज वीस वर्षांनंतर या व्यवसायातून त्या वर्षाला लक्षावधी रुपयांची कमाई करीत आहेत. त्यांच्या बांगडय़ांना विदेशात मोठी मागणी असून निर्यातीच्या ऑर्डर्स मोठय़ा प्रमाणावर मिळत आहेत. दिल्लीतील सूरजकुंड मेळय़ासारख्या महोत्सवांमध्ये मोठय़ा प्रमाणावर त्यांच्या बांगडय़ा खपतात. निर्धार आणि बुद्धी यांच्या जोरावर त्यांनी मारलेली ही मजल अनेकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.