ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) व भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांचा संघर्ष सर्वांना माहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर चिखलफेक केली जाते. नुकतेच खडसे यांनी बरं झालं महाजनांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होतं. यावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी आज खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा सवाल करत महाजन यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा डिवचले आहे.
गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले होते की, बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही. यावरून आज गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. खडसे आजकाल काय बोलत आहेत. याचे त्यांना भान नाही. मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत हे माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर ते वाईट आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना दिला आहे.
एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत त्याचं भान त्यांना नाही. ते आता बेभान झाले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, कधी मला चावट म्हणतात, माझ्याबद्दल वाटेल तसं ते बोलत आहेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. भोसरी प्रकरण, जिल्हा दूध संघ प्रकरण यांसारख्या अनेक त्यांच्या चौकशा सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत, असंही गिरीश महाजन म्हणाले.