प्रतिनिधी,कोल्हापूर
Satej Patil on BJP : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरु आहे. पण या देशात अमृत फक्त अदानी आणि अंबानी यांनाच मिळाले आहे. तर देशातील जनतेच्या पाठिमागे महागाईसह अन्य मार्गांनी काळ लागला आहे.भाजपने गेल्या नऊ वर्षात फक्त द्वेषाचे राजकारण केले आहे,असे सांगत भाजपच्या धोरणावर घणाघात करत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी केले.काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रा सांगता सभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या वतीने 3 ते 13 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा सुरु आहे.शनिवारी कोल्हापुरात या यात्रेचे आगमन झाले.सायंकाळी कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण शहरची सांगता सभा दसरा चौकात झाली.या सभेत आमदार सतेज पाटील यांनी भरपावसात भाजपच्या नऊ वर्षातील धोरणावर कडाडून हल्ला केला.
ते म्हणाले,जनसंवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात अशी यात्रा सुरु आहे. देशात आज अविश्वासाचे वातावरण आहे.देशातील बंधुभाव कमी होताना दिसत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे देश एकसंघ राहिला आहे.बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना आपल्याला वाचवायची आहे.महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जायचे आहे.
गॅस सिलेंडरच्या दरात नुकतीच दोनशे रुपयांची कपात केली आहे.याबाबत ते म्हणाले नऊ वर्षे लूट केली. आता ‘इंडिया’च्या बैठका होतील तशी महागाई कमी होईल.कोल्हापुरात शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यावेळी चुकीच्या घटना घडल्या.विविध विषयावरुन भाजप फटाक्या वाजवेल यामुळे आपण सावध राहिल पाहिजे.निवडणुकीच्या तोंडावर अनेक घटना घडणार आहेत.पण कोल्हापूरचे पुरोगामित्च टिकवण्याची जबाबदारी आपली आहे.स्वातंत्र्याचा अमृतमकाळ सुरु आहे.पण देशातील फक्त अदानी आणि अंबानीला अमृत मिळाले तर जनतेच्या मागे विविध मार्गाने काळ लागला आहे,अशी टीका केली.
कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला चांगला संदेश दिला आहे.काँग्रेस पक्षच लोकांना विश्वास आणि आधार देऊ शकतो, असे सांगत वन नेशन वन इलेक्शनवर त्यांनी टीका करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसल्याचे नमूद केले.तसेच ते म्हणाले,देशात परिवर्तन घडवायचे आहे.पण एकट्या सतेज पाटील यांच्यामुळे परिवर्तन होणार नाही.प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी.महात्मा गांधी आणि इतर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात आहेत, हे धाडस वाढत आहे.महापुरुषांचा खरा इतिहास पुसला जात आहे.सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकून दिशाभूल केली जात आहे.यामुळे अशा पोष्टना त्याचवेळी उत्तर देऊन भांडाफोड करावा.नथुराम गोडसे सारख्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केल्या जात आहेत हे दुर्देवी आहे.यामुळे यापुढे सावध राहिले पाहिजे.18 ते 25 वयोगटातील तरुणाईला सत्य इतिहास,वास्तव समजावून सांगितले पाहिजे.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या,जनसंवाद पदयात्रेमुळे कॉग्रेसबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे.हे सरकार धाकदपटशाही करणारे आहे.पुन्हा भाजपच्या हाती सता देऊ नका असे आवाहन जाधव यांनी केले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेने देशातील जनतेची मने जिंकली. जिह्यात आमदार सतेज पाटील यांनी जनसंवाद यात्रा काढून लोकांशी संवाद साधला.देशात बेरोजगारी,महागाई आहे. भाजप रोजगार निर्माण न करता केवळ दिशाभूल करत आहे.यामुळे आता देशासमोर कांग्रेस हाच पर्याय आहे. प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले.आभार पूजा नाईकवरे यांनी मानले.
सभेला आमदार जयंत आसगाकर,मधुरिमाराजे छत्रपती,शारंगधर देशमुख,बाजीराव खाडे,सुरेश कुऱ्हाडे,तौफीक मुल्लाणी,सरलाताई पाटील,निलोफर आजरेकर,संध्या घोटणे,भारती पोवार,उदय पोवार,शशिकांत खोत,वैभव तहसिलदार,गोकुळचे संचालक बाबासो चौगले,बयाजी शेळके,प्रकाश पाटील,बाजार समितीचे सुयोग वाडकर, कुमार आहुजा यांच्यासह माजी नगरेसवक नगरसेविका कार्यकर्ते उपस्थित होते.
2024 लोकसभा निवडणूक यु-ट्युबवर
लोकसभेची 2014 ची निवडणूक फेसबुकवर झाली.2019 ची निवडणूक व्हॉट्सअॅपवर झाली.आता 2024 ची निवडणूक यु-ट्युबववर होईल.यामुळे आपण सावध राहिले पाहिजे,असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.