पुणे / प्रतिनिधी :
महामार्गांवरील खड्डय़ांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात आंदोलने सुरू असून, आत्तापर्यंत 16 ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात मुंबई-गोवा व मुंबई-नाशिक महामार्गावरही आंदोलन करण्यात येणार आहे. त्या-त्या भागातील कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने आंदोलन करतील, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात दिला. लोकांचा राग मतपेटीत व्यक्त होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजणार नाही, असे मतही त्यांनी या वेळी नोंदविले.
पुण्यातील हडपसर येथील मनसे कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज म्हणाले, राज्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे हे काही आताच पडलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांवर खड्डे पडत आहेत आणि लोक या खड्डय़ांमधूनच प्रवास करत आहेत. उलट मला जनतेचेच जास्त आश्चर्य वाटते. रस्त्यांवरील खड्डय़ांवरून मनसैनिकांनी काही ठिकाणी तोडफोड केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी काही तोडफोड करण्याची गरज नाही. आंदोलन करताना लोकांना त्रास होणार नाही, एवढी काळजी घ्या, अशा सूचना मी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आत्तापर्यंत 16 ठिकाणी आंदोलन झाले. मुंबई-गोवा व मुंबई-नाशिक महामार्गाची अवस्था पाहता तेथील जिल्हय़ांतही यापुढे आंदोलन होईल. हे आंदोलन कशा पद्धतीने करायचे, खळळखटय़ाप् होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आंदोलन हे त्या-त्या भागात आपापल्या पद्धतीने होईल.
खरे तर मनसेने आतापर्यंत अनेक विषयांवर आंदोलन केले. तरीही पदरात काय पडले? लोकांचा राग मतपेटीत व्यक्त होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजणार नाही, असे सांगत लोक ज्या उमेदवारांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देत आहेत, ते प्रतिनिधीच रस्त्यांवरील खड्डय़ांसारखे प्रश्न उभे करत आहेत. तरीही जनता जातीच्या, धर्माच्या नावावरून त्यांनाच मतदान करत आहे. जोपर्यंत लोकांचा खड्डय़ांविरोधातील राग व्यक्त होणार नाही, तोवरही काहीही होणे अशक्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.