गटारी तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी, विद्युतखांब घराला लागून उभे केल्याने संताप
बेळगाव : नित्यानंद कॉलनी येथील महालक्ष्मी लेआऊटकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून याठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत भूमीगत वीजवाहिन्या घालणे बंधनकारक आहे. मात्र याठिकाणी घरासमोरच विद्युतखांब उभे करून वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याला या परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. याचबरोबर महापालिकेला निवेदन देऊन या समस्या दूर करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. महालक्ष्मी लेआऊटकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. येथील नागरिकांना जणू नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. बऱ्याच दिवसांपासून गटारी तुंबल्या आहेत. गटारी साफ करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी फिरकलेच नाहीत. आता पथदिपांसाठी मोठे विद्युतखांब घरासमोरच उभे करण्यात आले आहेत. गॅलरीला लागूनच विद्युतवाहिन्या जाणार आहेत. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा तातडीने हे काम बंद करावे आणि भूमीगत वीजवाहिन्या घालाव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिका आयुक्त यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले. येथील रहिवासी अॅड. बाळकृष्ण कांबळे यांच्यासह इतर नागरिकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत. विद्युतखांबांना विरोध केला असून हे काम सध्या थांबले आहे. तरी ते खांब तातडीने काढावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.