Na Dho Manohar Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांच वयाच्या 81 व्या वर्षी पुण्यात आज निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्यविश्व शोकाकूल झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. मी ,प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो.पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचा रानकवी हरपला- शरद पवार
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना.धो.महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना.धों.चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले.तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले.ना.धो.च्या कवितांनी रानातल्या कविता,पावसाळी कवितांनी ,जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.ना.धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.ना.धो.खूपच हळवे ,त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी ,प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो.पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला.ना.धो.चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हाव हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.
अक्षरे आणि मातीचे नाते, लेखणीतून मांडून कवितेचे अंकुर फुलवले- एकनाथ शिंदे
या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य. गावेनिसर्गातील चैतन्याचे गान मांडणारे, मातीशी नाळ घट्ट जोडून आभाळाला गवसणी घालणारे रानकवी ना.धों.महानोर यांच्या निधनाने मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.अक्षरे आणि मातीचे नाते, जोडलेपण आपल्या लेखणीतून मांडून त्यांनी अक्षरश: कवितेचे अंकुर फुलवले. त्यांच्या साहित्यकृतींना मातीचा अस्सल गंध होता. राज्य सरकारचा कृषीभूषण आणि केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.महानोर यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.या वेदनादायी प्रसंगातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना ईश्वर बळ देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
रानातल्या कवितांनी निसर्गाची सहल घडवली- अजित पवार
ज्येष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते.निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली.मराठी साहित्याला मातीचा गंध दिला.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन,ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं.त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली.मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ यांसारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्कारानं सन्मानित होते.राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’पुरस्काराचे मानकरी ठरले होते.शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं.त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे.महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मराठी मातीच्या सुगंधाने संपन्न साहित्य निर्माण केले- सुनील तटकरे
आपल्या साहित्याच्या माध्यमातून निसर्गाच्या जवळ नेणारे,महाराष्ट्राच्या मराठी मातीच्या सुगंधाने संपन्न साहित्य निर्माण करणारे ज्येष्ठ कवी,लेखक,गीतकार पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!