अरूणा वाघ यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वाघ यांच्या समग्र साहित्यावर आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय परिसंवाद हा विष्णू वाघ यांच्या कुटुंबाला विश्वासात न घेता आणि कार्यक्रमाबाबत तसेच विष्णू वाघ यांच्या हस्तलिखिताबाबत गाफील ठेवून मांडण्यात आला असल्याचा आरोप करत ऐन कार्यक्रमात श्रीमती वाघ यांनी हस्तलिखित सर्व साहित्य नाईलाजाने उचलले असता यावेळी कार्यक्रम आयोजित करणारे सुदेश आर्लेकर यांच्यात वादावादी झाली आणि जनतेसमोर तमाशा झाला.
श्रीमती अरूणा वाघ यांनी सांगितले, हे पाहून आपल्याला आश्चर्य झाले. विष्णू वाघ यांच्याबद्दल खोटे प्रेम व्यक्त करणारे आर्लेकर यांनी दोन वर्षांपूर्वी हस्तलिखित नेली आणि परत केली नाही. बाहेरच्याबाहेर पुस्तके छापण्याची तयारी होती. दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर वाघांच्या साहित्यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आपल्याला कुणीच विश्वासात घेतले नाही. हस्तलिखित द्यायचे सोडून आपल्या शिल्कीशब्दात अवमान केला. आपल्यासमोर हे साहित्य ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच या कार्यक्रमाला अत्यल्प प्रतिसाद पाहून फार दुःख झाले. कार्यक्रम करताना कुणी विचारात विश्वासात घेतले नाही असे त्या म्हणाल्या.
विष्णू वाघ यांच्या वाढदिनी कार्यक्रमाचे आयोजन करणार असून त्यासाठी पुस्तके हवी असल्याचेही आर्लेकर यांनी सांगितले होते. त्याकरिता अध्यक्षांना काही संपर्कही दिले होते. परंतु त्याची परतफेड अशी करेल हे माहिती नव्हते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी विष्णू वाघ यांच्यावर कार्यक्रमाचे आयोजन करत असून तुम्हाला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कार्यक्रम काय, त्याची रूपरेषा काय याबाबत काहीच माहिती दिली नाही. पणजीत भेटल्यानंतर अध्यक्ष हस्तलिखित एकत्र करून अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणार असल्याची माहिती कळाली आणि ही बातमी छापूनही आली आहे. त्यानंतर कार्यक्रमासाठी अनेक बैठका झाल्या. परंतु त्या बैठकांमध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात आले नाही. विष्णू वाघ यांचे सर्व साहित्य एकत्र करून त्यावरील असलेला कॉपीराईट आपल्या नावे करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत आहे. अप्रकाशित साहित्याद्वारे पैसा कमविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अरूणा यांनी केला आहे.