प्रत्येक विद्यार्थ्याला 5 निरक्षरांना शिकवावे लागणार ः मिळणार क्रेडिट स्कोअर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शत-प्रतिशत (100 टक्के) साक्षरतेचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. याकरता एक नवी साक्षरता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत विद्यापीठ आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी किमान 5 निरक्षर व्यक्तींना शिकवावे लागणार आहे. याकरता या विद्यार्थ्यांना क्रेडिट स्कोअर देखील मिळणार असून तो त्यांच्या अभ्यासक्रमात जोडला जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सध्या नव्या शैक्षणिक सत्रापासून सर्व विद्यापीटे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवी साक्षरता योजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याकरता एक विस्तृत दिशानिर्देश जारी केले आहेत. यात प्रत्येक अभ्यासक्रमाचा प्रोजेक्ट वर्क आणि असाइनमेंटला याच्याशी जोडण्यास सांगण्यात आले आहे. यात पदवी आणि पदव्युत्तर दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम सामील असतील. या योजनेच्या अंतर्गत एका निरक्षराला साक्षर केल्यास 5 क्रेडिट स्कोअर मिळतील. परंतु शिकणाऱयाला साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले तरच हे गुण जोडले जाणार आहेत. याकरता प्रत्येक विद्यापीठात आणि राज्य सरकारकडून काही केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
युजीसीनुसार या पुढाकारामुळे साक्षरतेच्या मोहिमेला मोठा वेग मिळणार आहे. सद्यकाळात देशात साक्षरतेचा दर सुमारे 78 टक्के आहे. तर यासंबंधी सुरू करण्यात आलेल्या नव्या अभियानात हे प्रमाण शंभर टक्के करण्याचे लक्ष्य आहे. याचदरम्यान युजीसीने विद्यापीठ आणि उच्चशिक्षण संस्थांना निरक्षर लोकांना शिकविणाऱया विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची सूचना केली आहे. या पुढाकारामागे विद्यार्थ्यांना शिक्षणासह काही जबाबदारी सोपविण्याचा उद्देश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना समाजाशी जोडून घेण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे. सद्यकाळात देशात 1 हजाराहून अधिक विद्यापीठे आणि सुमारे 45 हजार महाविद्यालये आहेत.