ऑनलाईन टीम/ तरुण भारत
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रम पार पडत आहेत. नागपुरातही टेन्को रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kkanhaiya Kumar) यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना कन्हैया कुमारनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर होत असल्याचा आरोप करत, ‘मला तर भीती वाटत आहे की कधी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधातही CBI चा वापर होईल’, असा टोलाही त्याने भाजपला लगावला आहे.
यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये कन्हैया कुमार काँग्रेसच्या सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपाला उपस्थित होता. त्यावेळी त्याने ‘मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे’, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींवर केली होती. देशाच्या नावावर मित्रांचं भलं करण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत कधीड डिझेल १०० रुपये लिटर झालं नाही. महागाई आकाशाला पोहोचली आहे. गांधींजींची हत्या करणारे लोक आज देश विकायला निघाले आहेत. पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार? असा खोचक सवालही कन्हैया कुमारने पुण्यात विचारला होता.
अग्नीपथ योजनेवरुन कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर टीका केली. केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणे गरजेचे होते. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या, असा आक्रमक पवित्रा त्याने घेतला होता. अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी आणि लॉलीपॉप दाखवायचे बंद करावे. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुले सैन्यात जात नाहीत, अशी घणाघाती टीका कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर केली होती.