ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. भाजप वगळता सर्वच पक्षांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान, या वक्तव्यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांवर हल्ला चढवला. गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती सुंदर लेण्या, डोंगर-खोरी, शिवरायांचे किल्ले आणि महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ अशा सगळय़ा चांगल्या गोष्टी राज्यपालांनी पाहिल्या असतील. म्हणजे त्यांनी, ‘महाराष्ट्र का घी देखा, लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा’. त्यामुळे आता राज्यपाल महोदयांना कोणीतरी कोल्हापूरचा जोडा दाखवायची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कोल्हापूरचा जोडा राज्यपालांना दाखवण्याची वेळ आली याचा अर्थ कोणी कसा घेईल हे माहिती नाही. जोड्याचा उपयोग, कोण कसा करेन याची खात्री नाही. बाकी माझ्या वक्तव्याचा अर्थ कोणी कसा काढायचा तो काढावा. महाराष्ट्राचा अपमान करून त्यांनी मराठी माणसाच्या मनात आग लावलीच आहे. याधीही त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दक हिंसक उदगार काढले. यानंतर आता मराठी माणसाचा अपमान केला. कोश्यारी यांचं भाषण मुंबईतून दिलं जातं की दिल्लीतून लिहून दिलं जातं हे माहिती नाही.
पण मी राज्यपाल पदाचा अवमान करु इच्छित नाही. याचं कारण राज्यपाल हे मानाचं पद आहे. राज्यपाल हे आपल्या देशाच्या राष्ट्रपतींचे दूत असतात. राज्यपालांच्या खुर्चीचा मान हा त्या खुर्चीत बसणाऱ्याने सुद्धा ठेवायचा असतो. तो त्या खुर्चीत सध्या बसवल्या गेलेल्या व्यक्तीने ठेवला नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
हेही वाचा : राज ठाकरेंनी काढली ‘कोश्यारींची होशियारी’, म्हणाले…