डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा जयहिंद महारक्तदान यात्रा उपक्रम : १९ नोव्हेंबरसाठी केली रेल्वे बुक
सांगली प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांना मानवंदना म्हणून आपण आपले रक्त देऊ शकतो या भावनेने डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनने नियोजन केले आहे. त्यानुसार दि. १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये सांगलीतील एक हजार युवकांना रेल्वेने घेऊन जाऊन रक्तदान करणार असल्याची माहिती पै. चंद्रहार पाटील यांनी दिली. यासाठी १६ नोव्हेंबर रोजी सांगलीतून रेल्वे बुक केली असून या माध्यमातून जयहिंद महारक्तदान यात्रेचे आयोजन केले आहे.
देशात सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी १ लाख बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प केला आहे. त्यातूनच तीन महिन्यांपूर्वी पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिर घेतले होते. त्यानंतर आतापर्यंत दहा हजार जणांचे रक्त संकलन करण्यात युथ फाऊंडेशनला यश आले आहे. याच दरम्यान दिल्ली येथून सशस्त्र सेना आधान केंद्र (आर्मी हॉस्पिटल) कडून रक्तदानासाठी संपर्क झाला. ही गोष्ट सहकाऱ्यांना सांगितली आणि अनेकांनी उत्साहाने दिल्लीला जाऊन रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा” हा आणि “चलो दिल्ली” असा संदेश दिला होता. तशीच हाक लष्कराकडून आल्याने आमचा उत्साह वाढला असे सांगून पै. चंद्रहार पाटील म्हणाले, सांगली जिल्हा हा शूरवीर सैनिकांचा जिल्हा आहे. 1947-48 पासून आजअखेर विविध युध्दात येथील दोनशे सुपुत्र सैनिकांनी आतापर्यंत देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. पाकिस्तान, चीन, श्रीलंकन बंडखोर, अतिरेकी यांच्याशी लढताना त्यांनी प्राणांची आहुती दिली. आजही सांगली जिल्ह्यातील जवळपास दहा हजार सैनिक विविध दलांमध्ये सेवा बजावत आहेत. असे असताना शत्रूशी लढताना जखमी होणाऱ्या या शूर विरांसाठी आपले रक्त कामी येऊ शकते हे आम्ही गावोगावच्या युवकांना पटवून दिले. त्याला प्रचंड प्रतिसाद पूर्ण जिल्ह्यातून मिळाला. सांगली, मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील युवक, निवृत्त सैनिक, महिला, शिराळा, तासगाव, मिरज, खानापूर, आटपाडी, कवठे महांकाळ, वाळवा, पलूस, कडेगाव, जत अशा सर्व ठिकाणचे मिळून एक हजार हून अधिक युवक, युवतींची नोंद झाली. मग त्या सर्वांसह एक रेल्वेच भरून महायात्रा काढायची असे ठरवून 16 नोव्हेंबरच्या रेल्वेचे बुकिंग केले. जी त्यादिवशी रात्री 8 वाजता सांगलीतून दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. 18 रोजी सकाळी दिल्लीत पोहोचेल. त्यादिवशी डॉ. आंबेडकर भवन येथे विश्रांती आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. 19 रोजी सकाळी दहा पासून आर्मी हॉस्पिटल येथे रक्तदान. 20 रोजी दिवसभर दिल्ली दर्शन आणि रात्री परतीचा प्रवास सुरू होईल. हा उपक्रम व्यक्तिगत माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसह सर्वांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढविणारा आहे असे सांगून चंद्रहार पाटील म्हणाले, जत, आटपाडी आणि पलूस या तालुक्यातील युवकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मी भारावलो. त्यातूनच अधिक प्रयत्न. सुरू केले आणि जिल्हा भरातील युवकांनी या उपक्रमाला उचलून धरले. आता एक लाख इतके रक्त संकलन अवघड वाटत नाही. जिल्ह्यातील युवा पिढीच ही जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन पुढे चालली आहे. तेच या मोहिमेचा प्रसार करत आहेत. मिलिटरी जी कधीही कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा करत नाही त्यांच्यासाठी म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी आपण आपले रक्त खर्ची घालत आहोत ही युवकांची भावना बनली असून आम्हाला असे काही विधायक करायचे होतेच. पण काय करावे हे समजत नव्हते. चंद्रहार पाटील फाऊंडेशनने आम्हाला हा मार्ग दाखवून एक ध्येय दिले ज्याची आज खूप गरज होती. अशी भावना युवक व्यक्त करत आहेत अशी माहितीही चंद्रहार पाटील यांनी दिली.
शहिदांना पुष्पचक्र वाहून प्रवास सुरू
१६ रोजी सांगलीतील शहीद सैनिकांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आम्ही प्रवासाला प्रारंभ करणार आहोत. त्या दोनशे वीरांचे आम्ही ऋणी आहोतच. पण आज सैन्यात जे आपल्या जिल्ह्यातील दहा हजार सैनिक आहेत त्यांनाही आमच्या कार्याचा अभिमान वाटून ते आपल्या सहकाऱ्यांना आमच्या जन्म भूमीतील युवकांनी बांधिलकी जपली याबद्दल अभिमानाने सांगू शकतील. त्यातूनच पूर्ण देशभर सैनिक आपापल्या भागात असाच रक्तदान करण्याचा संदेश पोहोचवून आपल्या कार्याला गती देतील असा विश्वासही डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला.