आम्ही महाविकास आघाडीतच असून त्यामुळे आमचा सहभाग इंडिया आघाडीमध्येही आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून आमचा विरोध नरेंद्र मोदींना असल्याचे विधान शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीशी आमची आघाडी दोन वर्षांपूर्वीची आहे. विधानपरिषदेत आमचा पराभव का झाला यावर विचार मंथन करूनच हा निर्णय घेतला गेला असून त्याला आता मूर्त स्वरूप देण्यासाठीच आम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालो. त्यामुळे ‘इंडिया’मध्ये सुद्धा आमचा सहभाग आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “संविधान वाचवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा विरोध नरेंद्र मोदीना आहे. आम्ही बीजेपी सोबत कधीच जाणार नसून आमचा विचार पक्का आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर तसेच इंडिया आघाडी आहे. आघाडीत ठरल्याप्रमाणे जागा वाटपाबाबत आम्ही जाहीर बोलणार नाही. आम्हाला प्रतिनिधित्व हवे आहे मात्र किती असावे हे आत्ताच सांगणार नाही. प्रगतीक विकास आघाडीमध्ये लोकसभेसाठीही काही जागांची मागणी आम्ही करणार आहोत. राजू शेट्टी इंडिया सोबतच आहेत. एमएसपी बाबतची भूमिका राजू शेट्टींच्या चळवळीचा गाभा आहे. इंडिया आघाडीतील पक्ष कोठेही इकडे- तिकडे जाणार नाहीत.” अशी त्यांनी भुमिका घेतली.
मराठा आरक्षणावर भाष्य करताना आमदार जयंत पाटील म्हणाले, “सरकारने आरक्षणाची 50 टक्केची अट रद्द करावी. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असून घटनेत बदल करूनच आरक्षण द्यावे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे.” असेही मत त्यांनी मांडले.