गिरीश मांद्रेकर /म्हापसा
तशी घरची परिस्थिती बिकटच, वडिल ट्रक चालवून आमचा सर्वांचा उदरनिर्वाह करीत होते. त्यात आपण अपंग. आर्थिक चणचणीमुळे भावाचे व आपले शिक्षण पूर्ण होणे शक्य नव्हते. तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्कॉलरशी मिळवून आपण शिक्षण पूर्ण केले आणि म्हापसा मार्केट निरीक्षकपदी नियुक्ती झाली. आयुष्यात उतार चढाव असतातच मात्र कदापी हिंमत न हारता पुढे जाणे गरजेचे आहे. पदरी यश हे नक्की येईलच, अशी माहिती म्हापसा नगरपालिकेच्या मार्केट निरीक्षक सोनाली राजाराम गडेकर यांनी दै ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
सोनाली या बस्तोडा सकलवाडा येथील रहिवासी असून म्हापसा नगरपालिकेमध्ये मार्केट निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. सोनाली यांचे प्राथमिक शिक्षण होलीक्रॉस बस्तोडा येथे झाले. केजी ते दहावीपर्यंत या ठिकाणी शिक्षण घेऊन त्यानंतरचे शिक्षण श्रीधर काकुलो कॉलेज खोर्ली म्हापसा सारस्वत संस्थेत वाणिज्य पदवी पर्यंत पूर्ण केले. 2013 साली म्हापसा नगरपालिकेत मार्केट निरीक्षक पदासाठी अर्ज आले होते आणि त्यात खास अपंग राखीव होते. त्या पदासाठी आपण अर्ज केला. आपल्याबरोबर अन्य काहीजणांनीही अर्ज सदर पदासाठी केला होता. पण आपल्या प्रयत्नांना यश आले आणि ते पद आपल्यास प्राप्त झाल्याचे सोनाली यांनी दै. ‘तरुण भारत’ला बोलताना दिली.
केवळ 3 हजार रुपयांत वडिल घर चालवित होते
आपल्या घरातील आपणच पहिली सरकारी नोकर. घरात अन्य कुणी शिकलेले नव्हते. भाऊही लहान होता, वडील खासगी ट्रक चालवून आमच्या घरचा उदरनिर्वाह करीत होते. त्याकाळी वडिलांना फक्त 3 हजार रुपये मानधन होते. अशा परिस्थितीत त्यांनी काबाड कष्ट करून आम्हाला शिकविले. म्हापसा पालिका ही आपल्या मतदारसंघात नव्हती. आपल्यास येथे नोकरी मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यावेळच्या गावच्या सरपंचा प्रतिक्षा मयेकर यांनी आपल्यास सदर पदासाठी अर्ज करण्यास सांगितले व अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी तासभरापूर्वी म्हणजे 4 वा. या पदासाठी अर्ज केला. नंतर आपली मुलाखत झाली अन् आपली निवड झाल्याचे सोनाली गडेकर यांनी सांगितले.
वकील व्हायचे होते पण……..
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता आले नाही. आपल्यास वकील व्हायचे होते. कीर्ती विद्यालय शिवोली येथे मिळालेल्या स्कॉलरशीपवर आपण शिक्षण पूर्ण केले असल्याची माहिती सोनाली यांनी दिली. आमचे घरही मातीचे आणि जुने होते. आपण कामाला लागल्यावर हळूहळू घराची दुरुस्ती केल्याचे त्यांनी सांगितले. आज भाऊही पणजीत पोलीस शिपाई म्हणून कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले.
भांडण मारहाण केल्यानंतर आपली चूक लक्षात आली
म्हापसा पालिकेत मार्केट निरीक्षक म्हणून रुजू झाल्यावर प्रथम तसे आपल्यास काही कळत नव्हते. आपल्यास अनुभवही नव्हता. लोकांची बोलणी खावी लागली. इतकेच नव्हे तर बाजारपेठेत भांडणे, मारहाणही झाली. मात्र नंतर चूक आपल्या लक्षात आली. सर्वांनी आपल्यास समजावले त्यात विशेषतः मुख्याधिकारी सीताराम सावळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यमान मुख्याधिकारी अनितेश शिरवईकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती त्यांनी दिली.
युवा पिढीने सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नये
युवा पिढीस आपल्या अनुभवातून सल्ला देताना सोनाली गडेकर म्हणाल्या की, युवा पुढीनी आपल्या शिक्षणाकडे अधिक भर द्यावा. सोशल मीडियावर आपला वेळ नाहक वाया घालवू नये. त्यासाठी पुढे खूप आयुष्य पडलेले आहे. गेलेला वेळ पुन्हा येणार नाही. खूप शिका आणि समाजात मोठय़ा पदावर जा. जेणेकरून उद्या तुम्हीही आपल्यासारखी यशस्वी गृहिणी बनू शकता, असे सोनाली म्हणाल्या.