राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बुथ कमिटी आढावा मेळावा; राज्यातील सरकारची भ्रष्ट मार्गाने स्थापना ; बुथ कमिटीच्या 1 सदस्याने 100 मतदारांची जबाबदारी घ्यावी – आमदार मुश्रीफ
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारकडून दडपशाहीचे धोरण अवलंबले जात आहे. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांची अनेक प्रकारची चौकशी लावून त्यांना संपवण्याचा कुटील उद्योग सुरू आहे. त्यामुळेच जनतेतून क्रांती घडवून आणण्यासाठी बुथ कमिटींची सक्षमपणे स्थापना करून भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेले सरकार उलथवून लावूया, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक आमदार शशीकांत शिंदे यांनी केले.
मार्केड यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयामध्ये आयोजीत केलेल्या पहिल्या बुथ आढावा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार अरूण लाड, माजी आमदार के.पी.पाटील, राजीव आवळे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचा संभाव्य राज्याभिषेक घडवून आणणारा हा मेळावा आहे. ज्याची सुरवात आंबाबाईंच्या आणि शाहूंच्या नगरीतून होत आहे. राज्यातील सरकार भ्रष्ट मार्गाने आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी अधिकारी यांच्या बदल्याचे दर पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवले आहेत. साडेतीन कोटी देवून बदली घेवून येणारा अधिकारी सर्वसामान्यांचे काम करणार नाही. केवळ दडपशाही करून पैसे मिळवण्याचे उद्योगच त्यांच्याकडून होणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुथ कमिटी स्थापन करून कार्यप्रवण करण्याचे मिशन हातात घेतले आहे. त्याची सुरवात कोल्हापूरातून होत असून राज्यासह देशात बदल घडल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी पक्ष हा साडेतीन जिह्यात आहे असे हिणवणाऱ्यांना सर्वच जिह्यात आमदार आणि खासदार निवडून आणून चपराक देवूया. सगळी कामे बाजूला ठेवून आता थोडे दिवस बुथ कमिटीकडे द्या. जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आभार मानले.
बुथ कमिटीच्या 1 सदस्याने 100 मतदारांची जबाबदारी घ्यावी
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, बुथ कमिटी यशस्वी करणे अवघड नाही. 1 हजार मतदारांसाठी एक बुथ प्रमुख आणि दहा सक्रीय सदस्य यामुळे प्रत्येकाच्या वाटणीला 100 मतदार म्हणजे पाच ते सात घरे वाटणीला येतील दररोज ख्याली खुशाली विचारताना राज्यात चाललेला आणि देशात चाललेला भ्रष्ट कारभाराची जरी चर्चा केली, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जागे केले तरी निवडणुकांत आपल्याला यश मिळेल. प्रत्येक निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होत आहे. मताला हजारो रूपये देण्याची परंपरा विरोधकांनी सुरू केली आहे. सगळेच प्रलोभनाला बळी पडत नाहीत. त्यामुळे बुथ कमिटीतील सदस्यांनी आता त्रयस्थ असण्राया मतदारांवर लक्ष केंद्रीत केले पाहीजे.
शासन ‘दारी’ नव्हे ‘बेडरुम’मध्ये आले तरी काय उपयोग होणार नाही
आमदार मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला आहे. मात्र कोट्यावधी रूपये मोजून आलेले अधिकारी गोरगरीबांची कामे करणार नाहीत ते घातलेले पैसे गोळा करायच्या मागे लागतील. त्यामुळे शासन आपल्या दारी नव्हे तर बेडरूममध्ये आले तरी उपयोग होणार नाही.
राज्याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी गरजेची
आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, 40 आमदार घेवून सत्ता स्थापन करताना केवळ खोकेच दिले नाहीत तर त्यापेक्षाही भयानक अशा आर्थिक घडामोडी झाल्या. राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारताना 96 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात आल्या. हे सर्व पैसे या आमदारांना देण्यासाठीच वापरण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या या भ्रष्ट कारभाराची चौकशी झाली पाहीजे.