वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) संपूर्ण आशिया चषक आयोजित करण्याची इच्छा श्रीलंकेच्या मंडळाने व्यक्त केल्याने त्यांच्यावर नाराज झाला असून त्यापोटी श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळण्याचा प्रस्तावही त्यांनी नाकारला आहे. ‘पीसीबी’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष नजम सेठी यांनी दिलेल्या प्रस्तावातील ‘हायब्रीड मॉडेल’नुसार पाकिस्तानमध्ये चार सामने खेळविण्याऐवजी संपूर्ण आशिया चषक श्रीलंकेत आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला गेल्याने पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट यांच्यातील संबंध बिघडले आहेत.
पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, पुढील महिन्यात श्रीलंकेत काही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा प्रस्ताव पीसीबीने नाकारल्यानंतर दोन्ही मंडळांमधील ताणलेले संबंध समोर आले आहेत. आगामी आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतर्गत दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तान संघ जुलैमध्ये श्रीलंकेला भेट देणार आहे. श्रीलंकेच्या मंडळाने पाकिस्तानला काही एकदिवसीय सामनेही खेळावेत असे सूचवले होते. कारण श्रीलंकेला त्यांचा संघ झिम्बाब्वेमधील विश्वचषक पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेतील जागा निश्चित करेल, अशी आशा आहे आणि त्यादृष्टीने ऑक्टोबरमधील मुख्य स्पर्धेपूर्वी काही एकदिवसीय सामने संघाने खेळावेत अशी त्यांची इच्छा अहे.
परंतु एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, पीसीबीने सुरवातीला या प्रस्तावावर विचार करू असे सांगितले आणि आता तो नाकारला आहे. आशिया चषक आयोजित करण्याची पाकिस्तानची पाळी असताना श्रीलंकेच्या मंडळाने सप्टेंबरमध्ये आशिया चषक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिल्याने पीसीबी खूश नाही याचे हे स्पष्ट संकेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पीसीबी अध्यक्ष सेठी आशिया चषकाच्या मुद्यावर बांगलादेश आणि अफगाणिस्तान मंडळांच्या प्रतिसादावर देखील खूष नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ज्यांच्याशी पाकिस्तानचे दीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत त्या श्रीलंकेने तसेच बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी भारतीय क्रिकेट मंडळाचे आणि इतर आशियाई क्रिकेट मंडळाच्या सदस्यांचे सेठी यांनी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्याच्या दृष्टीने मन वळवावे आणि उर्वरित आशिया चषक स्पर्धा इतरत्र हलवण्यापूर्वी किमान तीन ते चार सामने पाकिस्तानमध्ये खेळले जावेत अशी सेठी यांची अपेक्षा होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत ज्या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत, विशेषत: यापैकी काही मंडळांच्या प्रमुखांनी आयपीएल फायनलसाठी भारतात जाणे आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची भेट घेणे, त्यामुळे ते निराश झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.