3 महिन्यांत 900 हून अधिक जणांचा मृत्यू ः अन्य देशांना मदतीचे आवाहन
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तान पूर अन् अतिवृष्टीने संकटात सापडला आहे. पाकिस्तानातील स्थिती बिघडल्याने आतापर्यंत 900 हून अधिक जणांचा मृत्यू ओढवला आहे. सरकारने बिघडलेली सिथती पाहता राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 937 जणांना जीव गमवावा लागला असून यात 343 मुलांचा समावेश आहे.
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या (एनडीएमए) अहवालात 14 जूनपासून आतापर्यंत सिंध प्रांतात सर्वाधिक 306 जणांना जीव गमवावा लागला आहे. कराची, पंजाब, बलुचिस्तान प्रांतात स्थिती अद्याप गंभीर आहे. हवामान विभागाने तेथे धोक्याचा इशारा दिला आहे. तर बलुचिस्तान प्रांतात 234 जणांचा पूरसंकटामुळे मृत्यू झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात 185 आणि पंजाब प्रांतात 165 बळी गेले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानात 9 जणांना जीव गमवावा लागला आहे.
23 जिल्हय़ांमध्ये हायअलर्ट
एनडीएएनुसार ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानात 241 टक्के अधिक पाऊस पडला आहे. देशात सरासरी 166.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दर वर्षी सरासरी 48 मिलिमीटर पाऊस पडत असतो. सिंध प्रांतात 784 टक्के तर बलुचिस्तानात 496 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सिंध प्रांतातील 23 जिल्हय़ांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
सैन्याकडून बचावकार्य
पाकिस्तानचे सैन्य आणि स्थानिक प्रशासन बचावकार्यात सहभागी झाले आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. सुमारे 3 कोटी लोक बेघर झाले आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न देखील नाही. बलुचिस्तान प्रांताच्या प्रशासनाने लोकांना निवारा उपलब्ध करण्याकरता 1 लाख तंबूंची मागणी केल्याची माहिती हवामान बदलमंत्री शेरी रहमान यांनी दिली आहे.
सरकारचे आवाहन
पाकिस्तानचे सरकार पूरसंकट हाताळण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहे. याचमुळे सरकारने अन्य देशांकडून मदत मागितली आहे. सराकरला 5.78 लाख कोटी रुपयांच्या मदतनिधीची गरज आहे. तर आरोग्य क्षेत्राकरता 12.9 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पूरामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहता भरपाईसाठी सरकारला 9 अब्ज रुपयांची (भारतीय चलनात 72.08 हजार कोटी रुपये) गरज आहे. अतिवृष्टीमुळे यंत्रांचेही मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्यासाठी 4.64 अब्ज रुपये (भारतीय चलनात 37.07 हजार कोटी रुपये ) सरकारला उभे करावे लागणार आहेत.
हजारो घरांचे नुकसान
पूरामुळे 82,000 घरांचे नुकसान झाले आहे. ही घरे पुन्हा उभी करण्यासाठी 41 अब्ज रुपयांचा (भारतीय चलनात 3.27 लाख कोटी रुपये) खर्च येणार आहे. म्हणजेच प्रत्येक घरावर सुमारे 50 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. नुकसान पाहता अन्य देशांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. लोकांना मदत करण्याचा सरकारकडून पूर्ण प्रयत्न केला जात आहे. या अवघडसमयी परस्परांना साथ देण्याची आणि मदत करण्याची गरज असल्याचे उद्गार माहितीमंत्री मरियम औरंगजेब यांनी काढले आहेत.