वृत्तसंस्था/ कराची
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि सीईओ सध्या लाहोरमध्ये पोहोचलेले असून या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सामन्यांसाठी ‘हायब्रिड’ मॉडेल लागू करण्याकरिता दबाव आणणार नाही अशी हमी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ जोफ अॅलार्डिस हे खास करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून आश्वासन मिळवण्यासाठी लाहोरला आले आहेत, याची पुष्टी सूत्रांनी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली नाही, तर पाकिस्तानचा संघही भारतातील विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी जाणार नाही, असे पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी स्पष्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसी पदाधिकारी पाकमध्ये पोहोचले आहेत.
पीसीबीच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे प्रमुख नजम सेठी हे ‘हायब्रिड मॉडेल’ वापरात आणावा यासाठी दबाव आणू लागले असून त्यामुळे आयसीसी आणि विश्वचषकाचे यजमान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चिंतीत झाले आहे. सेठी यांनी आधीच सूचित केले आहे की, जर पाकिस्तान सरकारने मंजुरी दिली नाही किंवा संघाला भारतात पाठवण्याबाबत सुरक्षेची चिंता असेल, तर पीसीबी आयसीसीला पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यास सांगू शकते.