ढेकोळीवाडीतील प्रकार : अनेकवेळा तक्रारी करूनही बदली करण्याकडे दुर्लक्ष
वार्ताहर /तुडये
शिक्षकाची बदली करण्याकरिता शिक्षण विभागाकडून गेली 5 वर्षे दुर्लक्ष झाले आहे. तर शिक्षक बदलीचा अर्ज देतो म्हणून वेळ मारुन नेत असल्याने वैतागलेल्या पालकांनी अखेर ढेकोळीवाडी, ता. चंदगड येथील शाळेस विद्यार्थ्यांना बाहेर काढत कुलूप लावण्याचा प्रकार घडला आहे.
एकीकडे पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी महागडे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्याकडे पसंत करत आपली मुले इंग्रजी माध्यमातील शाळांना पाठवत आहेत. 12 वर्षांपासून एक शिक्षक शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने ढेकोळीवाडी शाळेत ठाण मांडून आहे.
या शिक्षकांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. या शिक्षकाच्या बदलीकरिता अनेकवेळा तक्रारी करूनही या शिक्षकाची बदली झाली नाही की तक्रार होऊनही हा शिक्षक स्वाभीमानाने शाळा सोडून इतरत्र बदली करून घेत नाही. याबाबत पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वीही या शिक्षकाच्या बदलीकरिता पालकांनी शाळेस टाळे ठोकले होते.
कोरोनामुळे 2 वर्षे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसल्याचे ठाम मत व्यक्त करत अखेर गावातील महिला व ग्रामस्थांनी संपूर्ण शाळा खोल्यांना कुलूप लावत शिक्षण विभागासमोर शिक्षकाच्या बदली करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. ग्रामशिक्षण कमिटीचे अध्यक्ष युवराज बाळेकुंद्री यांच्यासह महिला, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
12 पिढय़ांची वाट : सरपंच नरसिंगराव पाटील
येथील मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळणाऱया शिक्षकामुळे गेली 12 वर्षे येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. या शिक्षकामुळे 12 वर्षात 12 पिढय़ांचे वाटोळे या शिक्षकाला या ठिकाणी ठेवून शासनाने केले आहे. आणि शिक्षण खातेही या शिक्षकाच्या पाठीशी आहे हे दुर्दैव म्हणावे आहे. बेळगाव येथे वास्तव्य करणाऱया शिक्षकाला येता जाता त्रास होत नाही. शिक्षण विभागाला मात्र आपल्या तब्येतीची तक्रार सांगत याच गावी ठाण मांडलेल्या या शिक्षकाची येथून कायमस्वरुपी बदलीचे आदेश होईपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे, असे सरपंच नरसिंगराव पाटील यांनी सांगितले.