डावा-उजवा भेद न करणाऱ्या ज्येष्ठांची गरज
कोल्हापूर/सुधाकर काशीद
शांतता समितीच्या बैठकीत सगळे मुद्दे मान्य करायचे, व बाहेर आल्यावर आपआपल्याच मूळ भुमिकेशी ठाम राहायचे. अशांना शांतता समितीत स्थान दिले तर जिल्ह्यातील ‘शांतता’ खूप दूर राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्या शब्दाला समाजात मान आहे, स्थान आहे, समाजातील सर्व घटकात ज्यांच्याबद्दल चांगली भावना आहे, अशांनाच शांतता समितीत स्थान देणे ही काळाची गरज असणार आहे.
कारण यापूर्वीच शांतता कमिटीचा अनुभव पाहता त्यांचे तेच तेच चेहरे, तीच तीच भाषणे, तेच तेच सल्ले, शून्य उपयोगाचे ठरले आहे. कारण यापूर्वी अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय व पोलीस ठाण्यात हो ला हो अशी भूमिका व आपआपल्या कार्यक्षेत्रात परतल्यानंतर वेगळी सोयीस्कर भूमिका घेतल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.
समाजात शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी कायदा जरूर आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा समाजाने स्वत:हून काही मर्यादा, बंधने पाळली, सामंजस्यपणा बाळगला तर ते कायद्याहून अधिक परिणामकारक ठरते, असा अनुभव आहे. आणि हे काम समाजातील काही व्यक्ती, काही जबाबदार संस्थांनी यापूर्वी करून दाखवले आहे. विशेषत: कोल्हापुरात वस्ताद व तालीम संस्थांनी ही ताकद अनेकवेळा वापरली आहे. त्यांनी एखादा आदेश दिला तर तो पाळावयाचाच असे अलिखित ठरून गेले होते. आणि या तालमी किंवा वस्तादाकडून वावगे काही कधी सांगितलेच जात नसे. कारण तालीम ही एक संस्था असली तरी भागातल्या नैतिक सामर्थ्य असणाऱ्या लोकांनाच स्थान असे. त्यामुळे यापूर्वी 1967 साली कोल्हापुरात झालेली एक दंगल अनेक तालमीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रोखली होती.
अर्थात काळाच्या ओघात तालमींचे स्वरूप बदलत गेले. तालमीचा वटही कमी होत गेला. त्यामुळे प्रशासनानेही शांतता कमिटी तयार करताना स्थानिकांना स्थान दिले. अर्थात पहिली काही वर्षे त्यांनीही चांगली भूमिका बजावली. प्रशासनाला त्यांनी अडचणीच्या काळात बळ दिले. पण नंतर नंतर शांतता कमिटीत असे काही चेहरे घुसले की वर्षानुवर्षे ते जागा आडवून बसले. दंगल किंवा आपत्तीच्यावेळी ते कधीच घराबाहेर आले नाहीत. रस्त्यावर येऊन त्यांनी कधी जमावाला रोखायचा प्रयत्न केला नाही. बैठकीत मात्र ते जोरजोरात बोलत राहिले. त्यामुळे शांतता कमिटीचा उपयोगच झाला नाही. आणि शांतता कमिटीचा सामाजिक दबावच संपला.
कोल्हापुरात आजही अनेक लोक असे आहेत की त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांची विचारसरणी सरळ आहे. त्यांनी इशारा केला तरी फार नाही पण वीस पंचवीस आक्रमक तरूणही मागे फिरतील अशी त्यांची ताकद आहे. डावा-उजवा, आवडता-नावडता असा भेद न करता, वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायचे त्यांचे सामर्थ्य आहे. शहरातील अंतर्गत प्रवाह काय आहे, तो कसा वाहतो याचा त्यांना अंदाज असतो. पण शांतता कमिटीत त्यांना स्थान नसते. कारण प्रत्येक पोलीस ठाण्यातील विशेष शाखेतील कॉन्स्टेबल जी यादी तयार करतो, तीच यादी बाहेरून आलेला अधिकारी सहजपणे स्वीकारतो. त्यामुळे याच यादीचा प्रवास वर्षानुवर्षे पुढे चालू राहतो. त्यामुळे शांतता कमिटीचा अलीकडच्या काळात फारसा उपयोग झाला नाही. वृत्तपत्रात एखादी बातमी येण्यापुरते शांतता कमिटीचे अस्तित्व राहते. पण प्रत्यक्षात शहर किंवा समाजात अंतर्गत खदखद काय आहे, याच्या प्रवाहाची कल्पना एखाद्या दंगलीनंतरच दिसून येते.
गणेश उत्सवापूर्वी समित्यांची स्थापना
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश उत्सवापूर्वी महिला दक्षता समिती व शांतता समिती अशा दोन समित्यांची स्थापना होणार आहे. पोलीस महासंचालकांनीच अशा स्वरूपाच्या सुचना केल्या आहेत. अशा समितीत जर जाणकारांचा समावेश असेल तर पोलीसांना कायदा सुव्यवस्था राबवताना त्याचा फार उपयोग होतो. कोल्हापुरात असे जाणकार कार्यकर्ते अनेक आहेत. त्यांचा आम्ही योग्य त्या पध्दतीने आधार घेऊ.
सतीशकुमार गुरव (पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस स्टेशन)