वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत फळ रोपांना प्राधान्य : वृक्षसंवर्धन वाढीसाठी करार
प्रतिनिधी / बेळगाव
वृक्षांची संख्या वाढावी व पर्यावरणाचा समतोल राखावा, यासाठी वनखात्यातर्फे वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत शहरात तब्बल 20 हजार विविध रोपांची लागवड केली जात आहे. यासाठी सामाजिक संघटना व विविध संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. शिवाय लागवड केलेल्या रोपांचे संवर्धन व्हावे, यासाठी संबंधित संस्थेशी करार केला जात आहे. त्यामुळे साहजिकच वृक्षांचे संवर्धन होऊन झाडांची संख्या वाढणार आहे.
वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत विश्वेश्वरय्या नगर, धामणे एस., अशोकनगर ईएसआय हॉस्पिटल, मण्णूर डाएट, के. के. कोप्प शाळा परिसर आदी ठिकाणी रोप लागवड झाली आहे. शिवाय शुक्रवारी इतर ठिकाणीही लागवड केली जाणार आहे. राज्यात 5 कोटी रोपांची लागवड होणार आहे. त्यापैकी अडीच कोटी वनक्षेत्रात तर उर्वरित रोपे सर्वत्र लागवड केली जाणार आहेत.
रोप वाढीसाठी ‘जिओ टॅग’द्वारे नोंदणी
वृक्ष लागवडीसाठी संघ संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शिवाय रोपांच्या काळजीसाठी संबंधित संस्थेशी करार केला जात आहे. शिवाय रोपांच्या वाढीसाठी ‘जिओ टॅग’द्वारे नोंदणी केली जात आहे. विशेषत: रोपांच्या संवर्धनाबरोबर वाढीवरदेखील लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे रोपे नष्ट होण्याचे प्रमाणदेखील कमी होणार आहे.
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, रुग्णालये, शासकीय कार्यालये, औद्योगिक वसाहत, धार्मिक संस्था यासह इतर मोकळ्या जागेमध्ये रोपलागवड केली जात आहे. त्यामुळे विविध परिसर हिरवाईने नटणार आहे. विशेषत: फळ झाडांच्या रोप लागवडीला महत्त्व दिले जात आहे. आंबा, फणस, जांभुळ, पेरू, चिंच, बेल, पिंपळ, वड, कडिपत्ता, कडूनिंब आदी रोपांची लागवड होऊ लागली आहे.