ऑनलाईन टीम/तरुण भारत
मागील काही दिवसांपासून सातत्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत बेरोजगारी आणि जीएसटीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या वाढत्या महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी विरोधात कॉग्रेस आदोलन करणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे. ‘महागाई पर हल्ला बोल’ असे या रॅलीचे नाव असणार आहे. या रॅलीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर निशाणा साधत त्यांनी नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आव्हान दिलं आहे.
देशात वाढती महागाई, बेरोजगारीवर हल्लाबोल करत ‘राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त’ अशी खोचक टीका केली. महागाई विरोधात कोट्यवधी लोकांच्या आवाजाने आता वादळाचं स्वरुप धारण केलं असून हे वादळ देशातलं अन्यायी आणि निर्दयी सरकार उखडून टाकेल, असं राहुल गांधी म्हणाले.
“काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशाला इतकी महागाई कधीच दिली नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा भाजपाने कणा मोडला. केवळ दोन उद्योपतींनाच मोठं करण्यात येत आहे. मीडियादेखील सत्य दाखवत नाही, कारण मीडियाही त्या दोन उद्योगपतींच्या हातात आहेत. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘गेल्या आठ वर्षात नरेंद्र मोदी सरकारने देशातला गरीब व्यक्ती, मजूर, शेतकरी, छोटे दुकानदार यांच्यापैकी कुणाचं भलं केलं आहे? देशात द्वेष आणि भीतीचा फायदा फक्त दोन मोठ्या उद्योगपतींना होतोय. ही गोष्ट तुम्ही इतर उद्योगपतींना पण विचारू शकता. देशात विमानतळ, बंदरे, रस्ते-महामार्ग, मोबाईल फोन सेवा, तेल प्रक्रिया उद्योग हे सर्व काही केवळ या दोन उद्योगपतींच्या हातात जात आहे. प्रसारमाध्यमे देशात भीतीचं वातावरण निर्माण करून द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.
ईडीच्या (ED) चौकशीसंदर्भात बोलताना, “५५ तास मला ईडीच्या कार्यालयात बसवलं. पण मी मोदींना सांगू इच्छितो मी तुम्हाला घाबरत नाही. मग ते ५५ तास असो, पाच महिने किंवा पाच वर्ष कार्यालयात बसवलं तरी मला फरक पडत नाही. हा देश संविधानावर चालणारा आहे. जर आपण याविरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही”, असंही राहुल गांधी म्हणाले.