उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य : पावसाळ्यापूर्वी रस्ताकाम करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव-कोनेवाडी दरम्यानचा संपर्क रस्ता लवकरात लवकर कसा तयार होईल, त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी, तसेच शासनाने पावसाळ्यापूर्वी उचगावला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी उचगाव ग्रा.पं. माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या योगिता बाळासाहेब देसाई आणि या परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोनेवाडी गावातून रोज दीडशेच्या जवळपास विद्यार्थी, विद्यार्थिनी उचगाव येथील माध्यमिक शाळांना रोज येतात. मात्र तुरमुरी-कोनेवाडी संपर्क रस्ता ते उचगाव मार्ग झाडाझुडपांनी व्यापलेला कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात भरपूर चिखल तर उन्हाळ्यात भरपूर धूळ अशी परिस्थिती या रस्त्याची सातत्याने झालेली असते. याचा परिणाम विद्यार्थी वर्गावर होत आहे. यासाठी चांगल्या रस्त्याअभावी कोनेवाडीतील शाळकरी मुलांना हायस्कूलसाठी उचगाव व्यतिरिक्त इतर शाळांचा पर्याय शोधावा लागत आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांचीच बरीच मोठी कुचंबणा होत आहे. उचगाव सोडून बेळगावसारख्या ठिकाणी पाच ते दहा हजार रुपये डोनेशन देऊन प्रवेश घ्यावा लागतो. बसपाससाठी पैसे मोजावे लागतात. याचा परिणाम गरीब पालकांवर होत असल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे. उचगावनजीक असलेल्या म्हारकीच्या नदीवर पुलाची निर्मिती झाली. पण रस्त्याचे काम रखडले आहे.
हा पूर्ण रस्ता आडरस्ता आहे. आणि पावसाळ्यात पायी जाण्याच्यापण योग्यतेचा नाही. त्यामुळे तुरमुरीतून वळसा घालून उचगावला जावं लागतं. यासाठी विनाकारण बेळगाव-वेंगुर्ला या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून जाण्याचा धोका विद्यार्थीवर्गाला पत्करावा लागत आहे. परिणामी ग्रामस्थ, पालक नको म्हणून आपल्या मुलांना उचगावला शाळेत पाठवण्यासंबंधी उदासीनता दाखवत आहे. खास करून शैक्षणिक संस्थांनी या गैरसोयीची दखल घेतली तर बरं होईल. यासाठी संबंधित खात्याकडे अर्ज-विनंती उचगाव, कोनेवाडी या दोन्ही गावातील नागरिकांच्या वतीने करणे गरजेचे आहे. याबरोबरच उचगावमधील शेतकऱ्यांची शेती याच उचगाव-कोनेवाडी मार्गाच्या दुतर्फा पसरली आहे. पावसाळ्यात ये-जा करताना हा रस्ता शेतकऱ्यांसाठीसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. याबरोबरच प्रवाशांनाही बेळगाव-वेंगुर्ले.मार्गाचा अवलंब गर्दीच्या ठिकाणी करावा लागतो. तोच रस्ता जर डांबरीकरण झाला तर संपूर्ण वाहतूकही याच मार्गाने होईल. यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, असे जनतेचे म्हणणे आहे. तरी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी रोज पायपीट
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कोनेवाडीहून रोज हे विद्यार्थी शिक्षणासाठी म्हणून उचगावला पायपीट करत ये-जा चालू असते. या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता अनेक वेळेला या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन येण्याची वेळ येते. यात मुली जर असतील तर त्या भयभीत होतात. यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. म्हणजे या मुला-मुलींना रोज सायकलद्वारे ये-जा करण्यासाठीचा हा प्रवास सुखकर होईल.
– योगिता बाळासाहेब देसाई