मार्ग ताम्हाने / प्रशांत चव्हाण
चिपळूण तालुक्यातील वहाळ- मोरेवाडी या माझ्या गावात मी लहानाचा मोठा झालो. बालपणी आमच्या मोरेवाडीचा बाल्या डान्स होता. मी त्याचा तुरेवाला शाहीर होतो. त्यावेळचा बाल्या डान्स हा खूप बघण्यासारखा, संस्कृती जपणारा व कोकणचे दर्शन घडविणारा होता. मात्र, आता त्याचे बदलते रुप पाहवत नाही, अशी खंत व्यक्त करुन गणेशोत्सवातील संस्कृती बिघडवू नका, ती जपा असे आवाहन महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी केले आहे.
तरुण भारतशी संवाद साधताना ते म्हणाले, “कोकणातील गणेशोत्सव हा राज्यभरात नव्हे तर देशामध्ये प्रसिध्द आहे. येथील रुढी, परंपरा, संस्कृती आपल्या जीवापाड जपल्या आहेत. त्यामुळे त्या टिकविणे गरजेचे असल्याचे प्रभाकर मोरे यांनी सांगितले. मी बालपणी गावामध्ये घडलो. दहावीपर्यंत शिक्षण वहाळ हायस्कूलमध्ये तर पुढील शिक्षण चिपळूण डीबीजे महाविद्यालयात झाले. यानंतर करीअरसाठी मुंबईची वाट धरली. असे असले तरी मी गावचा गणेशोत्सव विसरलेलो नाही. वेळात वेळ काढून मी गणपतीला येतो. आता गणपती आणण्याची सोय वाहनाने असली तरी मी पूर्वीपासून डोक्यावरुन गणपती घरी आणायचो. हीच खरी माझी भक्ती आहे. तेव्हा रानफुले, बांबू, झाडांची झापे, फांद्या, वेली यांपासून आम्ही गणपतीची आरास करायचो. सा नसला तरी अशा साधनांचा वापर करुन गणपती भोवतालची सजावट खूप छान वाटायची. पताका करणे, कागदी कंदिले लावणे या माझ्या आवडीच्या गोष्टी. आता माणसाकडे पैसा आला आणि सजावटीत बदल झाले मात्र, पूर्वीसारखे पर्यावरणपूरक आरास, सजावट करणे हीच श्री गणेशाची खरी आराधना होय.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे बोलताना त्यांनी, “आजच्या बाल्या डान्समध्ये खूप बदल झाला आहे. म्युझिक सिस्टीम, डोळे दिपवणारी विद्युतरोषणाई, मोठमोठे डिमर यामुळे बाल्या डान्स कमी आणि भंपकपणा जास्त पहायला मिळतो. त्यातच अश्लील भाषा त्यामुळे यातील खरी मजा गेली आहे. गणेशोत्सवात हरितालिका पूजन, ऋषी पंचमी, गौरी आणणे ही मजाही काही वेगळीच. पूर्वी महिलांचे झिम्मा, फुगडी, गाणीगप्पा रात्रभर चालायच्या. माणसे रात्रभर जागायची. गौरी आल्या की, टिपऱ्यांच्या नृत्याला अधिक बहर यायचा. आता मोबाईलच्या युगात हे फारसे पहायला मिळत नाही. गणेशोत्सवाचे संपूर्ण स्वरुपच बदलले आहे. बदलते तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे मात्र, आपली खरी कोकणी संस्कृती, पूर्वीसारखी गणेशोत्सव परंपरा जपली पाहिजे, तरच या उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.” असे मत त्यांनी व्यक्त केले.