इंडिया आघाडीतीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली. त्यामुळे या भेटीने प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीमध्ये प्रवेशाला मान्यता मिळणार असल्याच्या चर्चा राजकिय स्तरावर घडून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ प्रबंधाला 100 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुंबईमधील वाय.बी. चव्हाण सेंटरवर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
गेले काही महिने राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर सातत्त्याने टिका करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीमध्य़े प्रवेश करणार का याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. भाजपविरोधात लढाई करायची असेल तर इंडिया आघाडीतून काम करावे लागेल असे काही दिवसापुर्वी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही बोलून दाखवले होते. पण वंचितच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाला दस्तुरखुद शरद पवार यांचाच विरोध असल्याने वंचितचा इंडिय़ा आघाडीतील प्रवेश खोळंबला आहे असेही वर्तवले जात होते.
दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांनी आपल्या 9 आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा देऊन शरद पवार यांना धक्का दिला. न्यायालयीन लढाईमध्ये शरद पवारांच्याच अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले.
त्यानंतर आज शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे वंचित बहूजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीमध्ये प्रवेश करणार का ह्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
माध्यमांनी आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये सामिल होण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रूपी या प्रबंधाला 100 वर्षे पुर्ण झाल्याबद्दलचा होता. यावेळी कोणत्याही राजकिय घडामोडीवर चर्चा झालेली नाही. मी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कॉफी घेतली. त्यामुळे इंडिया आघाडीमधील प्रवेशासंदर्भात आताच काही सांगता येणार नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.