अक्षता मंगल कार्यालय ते मलकापूर फाट्यापर्यंत बॅरिगेटिंग
► प्रतिनिधी/ कराड
सहापदरीकरणापर्यंत कराडच्या नव्या उड्डाणपुलाच्या कामास गती आली आहे. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडल्यानंतर आता मलकापूर शहरातून जाणारा आणि प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी असलेला भराव पूल पाडण्याच्या पार्श्वभूमीवर डी. पी. जैन कंपनीने तयारी सुरू केली आहे. कंपनीच्या माध्यमातून अक्षता मंगल कार्यालय ते मलकापूर फाटा या दरम्यान भराव पुलास बॅरिगेटिंग करण्याचे काम सुरू झाले आहे. भराव पूल पाडण्याचे काम कंपनीसह स्थानिक प्रशासनासमोर आव्हान उभे करणारे आहे.
कराड, मलकापूर शहरात सहापदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून सोमवारी सायंकाळपर्यंत कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचा तिसरा गाळा पाडण्याची तयारी सुरू होती. उ•ाणपूल पाडला जात असतानाच अक्षता मंगल कार्यालय ते मलकापूर फाटा या दरम्यानचा भराव पूल पाडण्यापूर्वीचे काम जैन कंपनीने हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर अक्षता मंगल कार्यालय ते मलकापूर फाटा या दरम्यान भराव पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेटिंग सुरू केले आहे. वास्तविक उड्डाणपुलापेक्षा भराव पूल पाडण्याचे काम आव्हानात्मक असून या पुलाच्या दोन्ही बाजूला मंगल कार्यालये, कृष्णा रूग्णालये, फळविक्रेते, हॉटेल, व्यावसायिक गाळे आहेत. त्यामुळे भराव पूल पाडताना या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन स्थानिक रहिवासी, नागरिकांना तात्पुरता त्रास होण्याची शक्यता आहे. भराव पूल पाडताना वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सरोजनी पाटील यांच्यासह पोलिसांनी सोमवारी भराव पुलाच्या परिसरात पाहणी केली. भराव पूल पाडताना धुळीच्या त्रासाला स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. कदाचित एक दोन दिवसांसाठी व्यवहार बंद ठेवावे लागतील, अशीही चर्चा आहे मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. अफवांवर नागरिक, वाहनधारकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.