महापालिकेने सर्व्हिस रस्त्याची समस्या काढली निकालात
प्रतिनिधी /बेळगाव
कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या उभारणीवेळी मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेऊन मालमत्ता हटविण्यास स्थगिती घेतली होती. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नुकसानभरपाई द्या, नंतरच मालमत्ता हटवून घेऊ, अशा भूमिकेवर मालमत्ताधारक ठाम होते. मात्र अलीकडेच महापालिकेने सदर मालमत्ता हटविल्या असून सर्व्हिस रस्त्याची समस्या निकालात काढली आहे.
कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या कामावेळी कपिलेश्वर रोड 60 फुटाचा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार मालमत्ता हटविण्यासाठी महापालिकेने मार्किंग केले होते. मात्र हा रस्ता 45 फूट असताना 60 फूट करण्यासाठी आटापिटा का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महापालिकेने उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मालमत्ता हटविण्याची कारवाई हाती घेतली होती. त्यामुळे मालमत्ता हटविण्यास स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. सीडीपीप्रमाणे हा रस्ता 45 फुटाचा असल्याने या जागेमध्येच उड्डाणपुलाची उभारणी आणि सर्व्हिस रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मालमत्ता हटविण्यास न्यायालयाकडून स्थगिती घेण्यात आली होती. परिणामी येथील सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले होते. उड्डाणपुलाची उभारणी करून 8 वर्षे झाली. पण येथील सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न सुटला नव्हता. सर्व्हिस रस्ता नसल्याने स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसल्याने पावसाळय़ात येथील घरांमध्ये पाणी शिरत होते. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याची समस्या निकालात काढावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. पण मालमत्ता हटवून घेण्यासाठी नुकसानभरपाई द्यावी, अशी भूमिका मालमत्ताधारकांनी घेतली होती. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याचा मुद्दा रखडला होता. अखेर येथील अतिक्रमणे व मालमत्ता हटविण्याची कारवाई मनपातर्फे करण्यात आली. येथील मालमत्ता जेसीबीच्या साहाय्याने हटवून सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न निकालात काढण्यात आला आहे.