Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून आज मोठा दिलासा मिळाला. गुजरात हायकोर्टाने दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.राहुल गांधी यांना दिलेल्या शिक्षेला कुठलेही पुरेसे कारण नसल्याचे म्हणत सुप्रीम कोर्टानं शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिलाय. हा निर्णय देताना सार्वजनिक जीवनात वावरताना भान ठेऊन वक्तव्य केली पाहीजेत असेही सुप्रीम कोर्टाने राहूल गांधी यांना सुनावलय.कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतीक्रिया दिली. यावेळी मोदी सरकारवर खरगे यांनी निशाणा साधला.
आज लोकशाहीचा विजय झाला. हा विजय राहुल गांधी यांचा एकट्याचा नसून, जनतेचा आहे. आज आनंदाचा दिवस आहे. लोकशाहीचा, संविधानाचा विजय झाला सत्यमेव जयते! याचा फायदा देशाला झाला. सत्यासाठी, देशाच्या हितासाठी, युवकांसाठी, महागाईसाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत चालत सगळ्यांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचाच हा आशीर्वाद आहे. राहुल गांधी यांची खासदारकी घालवण्यासाठी 24 तास लागले. आता खासदारकी पर मिळण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहावे लागेल. आम्ही वाट पाहू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मोदी सरकारला आपण चूक केलीय का अस वाटत असेल. यावर मी आता भाष्य करणार नाही. हा जनतेचा विजय आहे. आज लोकशाहीचा विजय झाला. सत्यमेव जयते असेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, आज ना उद्या सत्याचा विजय होतो. जे काही होईल ते होईल. मला काय करायचे आहे, माझ काय काम आहे याबाबत माझ्या डोक्यात क्लिअर आहे. ज्यांनी मदत केलीय त्यांचे आभार जनतेचे आभार अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.