गुलाम नबी आझाद यांचा गौप्यस्फोट : भाजपचाही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गांधी घराण्याशी असलेले घनिष्ट नाते तुटल्यानंतर काँग्रेस सोडून वेगळा पक्ष स्थापन करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. गांधी घराणे नेहमीच उद्योगपतींशी जोडले गेले असून राहुल गांधी परदेशात नको असलेल्या उद्योगपतींना भेटतात, असा गौप्यस्फोट आझाद यांनी केला आहे. यानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेत अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधणाऱ्या राहुल गांधी यांच्याकडे उत्तर मागितले आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी संबंधित उद्योगपतींची नावे आणि आपला अजेंडा स्पष्ट करावा, अशी मागणी केली आहे.
अलीकडच्या काळात राहुल गांधींनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये राहुल यांनी अदानींच्या कंपनीत गुंतवलेले 20 हजार कोटी ऊपये इतकी बेनामी रक्कम कोणाची आहे, असा प्रश्न विचारला होता. यामध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांचा उल्लेख केला. यात गुलाम नबी आझाद यांचेही नाव होते. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आझाद यांनी त्यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आपल्या संपर्कात असलेल्या उद्योगपतींना भेटण्यासाठी विदेशात जातात, असा थेट आरोप आझाद यांनी केला. राहुलसह संपूर्ण गांधी कुटुंबाचे उद्योगपतींशी लागेबांधे असल्याचे सांगत मी यासंबंधीची 10 उदाहरणे देऊ शकतो. तसेच ते कोणत्या देशात कोण-कोणत्या उद्योगपतींना भेटले हेही सांगू शकेन, असे ते पुढे म्हणाले.
गांधी कुटुंबाशी घनिष्ट संबंध
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आझाद यांचे गांधी कुटुंबाशी पाच दशके जुने नाते आहे. साहजिकच त्यांच्या कुटुंबातील बऱ्याच लहान-सहान बाबींची आझाद यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळेच आझाद यांनी गांधी कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. आझाद यांनी गेल्यावषी ऑगस्टमध्ये डेमोव्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. आझाद यांच्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षानेही राहुल यांना घेरले आहे. भाजपने राहुल यांना भेटलेल्या उद्योगपतींची नावे उघड करण्यास सांगितले आहे.
राहुलसह काँग्रेस नेतृत्त्व प्रभावहीन
राहुल गांधी यांच्या आरोपांनी व्यथित झालेल्या आझाद यांनी भारतात काँग्रेस उरलेली नाही. काही निवडक नेतेच पक्षात राहिले असून राहुल गांधींसह सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचा आता प्रभाव राहिलेला नाही. भारत जोडो यात्रेनंतर राहुलचा प्रभाव वाढल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. पण माझा त्यावर मुळीच विश्वास नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेचा आगामी निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नाही, असे आझाद यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेतृत्त्वावर तऊण पिढी आमच्यापेक्षा 10 पट जास्त नाराज आहे. या नाराजीतूनच दिग्गज नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी पक्ष सोडला. अनिल अँटोनी हे केवळ एक उदाहरण असून देशाच्या अन्य भागातही काँग्रेस नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.